विक्रम मिस्री: तीन पंतप्रधानांचे विश्वासू सचिव, आता ट्रोलिंगच्या भोवऱ्यात!

विक्रम मिस्री

शस्त्रसंधी आणि ट्रोलिंगचा वाद
१० मे २०२५ रोजी भारत-पाकिस्तान शस्त्रसंधी जाहीर झाली आणि त्याची अधिकृत घोषणा परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी माध्यमांसमोर केली. या निर्णयानंतर सोशल मीडियावर काही ट्रोलर्सकडून विक्रम मिस्री यांच्यावर टीका सुरू झाली. त्यांच्या ‘X’ (माजी ट्विटर) अकाऊंटने ‘प्रोटेक्टेड मोड’ घेतल्यामुळे ही ट्रोलिंग अधिक चर्चेचा विषय ठरली.
विशेष म्हणजे शस्त्रसंधीचा निर्णय हा राजकीय नेतृत्वाच्या निर्देशानुसार घेतलेला असूनही, त्याचा रोष एका अधिकारीवर काढण्याचा प्रयत्न झाला. यावर अनेक ज्येष्ठ राजदूत, विश्लेषक आणि राजकीय नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आणि विक्रम मिस्री यांच्या पाठीशी उभे राहिले.

समर्थनार्थ पुढे आलेली नामवंत मंडळी
यूएईमधील भारताचे माजी राजदूत नवदीप सुरी यांनी म्हटलं की, “विक्रम मिस्री हे अत्यंत प्रभावी, शांत, संयमी आणि स्पष्टवक्ते आहेत. त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर होणारे ट्रोलिंग लाजिरवाणं आहे.”
ज्येष्ठ पत्रकार वीर संघवी यांनी ट्रोल करणाऱ्यांना ‘माणूस म्हणून कचरा’ असे संबोधले, तर विश्लेषक इंद्राणी बागची यांनी म्हटलं की, “राजनयिकांवर नाही तर निर्णय घेणाऱ्या नेतृत्वावर प्रश्न विचारायला हवेत.”
ओवैसी आणि केरळ काँग्रेससह अनेक राजकीय नेत्यांनीही या ट्रोलिंगचा निषेध करत विक्रम मिस्री यांची पाठराखण केली.

विक्रम मिस्री: अनुभव आणि कारकिर्द
• विक्रम मिस्री हे १९८९ बॅचचे IFS अधिकारी असून, त्यांनी १५ जुलै २०२४ रोजी भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून पदभार स्वीकारला.
• त्यांनी युरोप, आशिया, उत्तर अमेरिका अशा विविध भागांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.
• ब्रुसेल्स, ट्युनिस, इस्लामाबाद, वॉशिंग्टन डीसी, श्रीलंका, म्युनिक येथे त्यांनी महत्त्वाच्या राजनयिक भूमिका बजावल्या आहेत.
• २०१४ मध्ये स्पेनमधील भारताचे राजदूत, 2016 मध्ये म्यानमार आणि 2019 मध्ये चीनमध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती मिळाली होती.
• २०२२ ते २०२४ दरम्यान ते उप-राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (Strategic Affairs) होते.
• त्यांनी पंतप्रधान कार्यालयात इंद्रकुमार गुजराल, मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव म्हणूनही काम पाहिले आहे.
• परराष्ट्र मंत्रालयाच्या पाकिस्तान डेस्कवर त्यांनी विशेष भूमिका बजावली आहे.

शैक्षणिक आणि वैयक्तिक पार्श्वभूमी
• विक्रम मिस्री यांचा जन्म श्रीनगर येथे झाला. शालेय शिक्षण श्रीनगर, उधमपूर आणि ग्वाल्हेरच्या सिंधिया स्कूलमध्ये झालं.
• त्यांनी दिल्ली विद्यापीठातील हिंदू कॉलेजमधून इतिहास विषयात पदवी मिळवली आणि XLRI जमशेदपूर येथून एमबीए पूर्ण केलं.
• सरकारी सेवेत प्रवेश करण्याआधी त्यांनी जाहिरात आणि मीडिया क्षेत्रातही काही काळ काम केलं.

राजनयिक धोरणांच्या केंद्रस्थानी एक संयमी व्यक्तिमत्त्व
विक्रम मिस्री हे केवळ अधिकारी नसून, भारताच्या परराष्ट्र धोरणांचे प्रत्यक्ष साक्षीदार असून अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांचे मत महत्त्वाचे ठरले आहे. शांतपणे आणि व्यावसायिकतेने काम करणाऱ्या अशा व्यक्तीवर झालेलं ट्रोलिंग हे भारतीय लोकशाहीतील परिपक्वतेवर प्रश्नचिन्ह उभं करतं.

निर्णय प्रक्रियेत सहभागी नसलेल्या अधिकाऱ्यांवर ताण टाकणं ही प्रवृत्ती समाजाला मागे नेणारी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *