Jabari Khabari – Latest Marathi News | ताज्या बातम्या

HEADLINES

लाल समुद्रातील लाल थरार !

कल्पना करा, तुम्ही पाण्याखालील गूढ निळ्या दुनियेत उतरता. खिडकीबाहेर रंगीबेरंगी कोरल रीफ, मासे तुमच्याभोवती फिरतायत. तुम्ही त्या क्षणाला कॅमेऱ्यात कैद करताय, जणू वेळ थांबल्यासारखा वाटतंय. पण त्या शांततेत अचानक एक गडगडाट होतो, आणि तुम्ही पाण्यात बुडायला लागता. हे ऐकूनचं किती भयावह वाटतं ना. असंच काहीसं गुरुवारी लाल समुद्रात घडलं. सिंदबाद पाणबुडी, ज्याने हजारो पर्यटकांना समुद्राच्या गूढ दुनियेचा अनुभव दिला, ती एका थरारक घटनेचं कारण ठरली.

सकाळी १० वाजता पर्यटक सिंदबाद पाणबुडीमध्ये समुद्राच्या तळाशी असलेल्या रीफ्स पाहण्यासाठी उत्साहाने निघाले. पण काही मिनिटांतच पाणबुडीचं नियंत्रण सुटलं, आणि ती बुडायला सुरुवात झाली. एकेक क्षण जणू मृत्यूशी झुंज देणारा होता. पाणबुडीतील ४५ प्रवाशांपैकी ३९ जण बचावले गेले, मात्र सहा रशियन नागरिकांनी आपले प्राण गमावले; ज्यात लहान मुलंही होती. या दुर्दैवी घटनेचे साक्षीदार ठरलेल्या एलेना बोल्डारेवा यांनी सांगितलं, “प्रत्येक जण स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. काहींनी पोहून स्वतःला वाचवलं, तर काहींच्या वाट्याला ही संधी आलीच नाही.”

ही पाणबुडी पर्यटनासाठी सुरक्षित समजली जात होती, पण अचानक झालेल्या अपघाताने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तंत्रज्ञान अपयशी ठरलं, की मानवी चूक होती, याचं उत्तर शोधायला हवं. पर्यटन क्षेत्राला आता भविष्यातील धोके टाळण्यासाठी सुरक्षेच्यादृष्टीने काही गोष्टींचा पुनर्विचार करावा लागेल.
नवनवीन रोमांचक अनुभव घ्या, नवं शिकायला आणि पाहायला जा, पण आपल्या सुरक्षेला कधीही गृहित धरू नका. कारण जीवन जगण्यासारखं तेव्हा असतं, जेव्हा तुम्ही ते सुरक्षित ठेवता.

या घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तुमच्या मते, पर्यटनासारख्या आनंददायी प्रवासात सुरक्षितता अधिक मजबूत कशी करता येईल? या घटनेने काय शिकायला हवे? याबद्दल तुमचे विचार आम्हाला नक्की कळवा.

About The Author

SHARE THIS POST :

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest