औरैया जिल्ह्यातील एका शांत गावात घडलेला भयानक खून सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. लग्नानंतर अवघ्या १५ दिवसांत एका नवविवाहित तरुणाची हत्या त्याच्याच पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
मैनपुरी जिल्ह्यातील दिलीप आणि औरैया जिल्ह्यातील प्रगती यांचा विवाह ५ मार्च २०२५ रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला. मात्र या नव्या संसारामागे एका भयानक कट लपला होता. लग्नाच्या आधीपासूनच प्रगती आणि अनुराग नावाच्या तरुणामध्ये प्रेमसंबंध होते. चार वर्षांच्या या नात्यामुळे प्रगती अनुरागच्या प्रेमात अडकलेली होती. घरच्यांचा विरोध असल्यामुळे तिने दिलीपसोबत लग्न केलं, पण तिचं मन अजूनही अनुरागकडेच होतं.
प्रगतीने तिच्या प्रियकरासोबत मिळून दिलीपला संपवण्याचं ठरवलं. १९ मार्च रोजी दिलीप कन्नौजहून परत येत असताना, त्याला कालव्याजवळ एका हॉटेलमध्ये थांबवण्यात आलं. तेथून त्याला एका निर्जन ठिकाणी नेऊन शूटरच्या सहाय्याने गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांनी खुलासा केला की, प्रगतीने लग्नाच्या आहेरातून मिळालेल्या पैशांतून २ लाख रुपये शूटरला दिले होते. तिने हे पैसे प्रथम अनुरागकडे दिले, ज्याने ते शूटरपर्यंत पोहोचवले. हत्येच्या पाठीमागे प्रगती आणि अनुरागचं नियोजन असल्याचं स्पष्ट झालं. प्रकरणाची चौकशी करताना पोलिसांनी प्रगती, तिचा प्रियकर अनुराग आणि एका शूटरला अटक केली आहे. चौकशीदरम्यान प्रगतीने आपल्या पतीच्या हत्येचा कट रचल्याची कबुली दिली. दिलीप हा तिच्या आणि अनुरागच्या प्रेमसंबंधांमधला अडथळा असल्याचं तिने सांगितलं.
प्रगती आणि अनुरागच्या या भयानक कटाने संपूर्ण समाजाला हादरवून सोडलं आहे. एका साध्या लग्नाच्या मागे असा भीषण कट रचला जाईल, याची कुणालाही कल्पना नव्हती. या प्रकरणाने नात्यांमधील विश्वासघाताचं एक भयंकर स्वरूप समोर आणलं आहे. या घटनेने माणुसकी, नातेसंबंध, आणि प्रेम यावर विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण केला आहे – माणूस आपल्या इच्छांसाठी इतका क्रूर होऊ शकतो का?