Jabari Khabari – Latest Marathi News | ताज्या बातम्या

HEADLINES

Leopard Attacks:बिबट्यांच्या दहशतीनं गावात सोयरिक जुळेना

Leopard Attacks in Pune

पुण्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुका हे भाग केवळ निसर्गसौंदर्यासाठी नव्हेत, तर इथल्या लोकजीवनातील विविध प्रथेसाठी प्रसिद्ध आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून या परिसरातील गावांमध्ये एक वेगळीच समस्या डोकं वर काढतेय. रात्रीच काय, आता दिवसाढवळ्या बिबटे गावांमध्ये घुसत आहेत. शेतशिवारात, घरांच्या आसपास, अंगणात कुठेही मोकाटपणे फिरतात. शेकडो गुरं-ढोरं, पाळीव जनावरं आणि दुर्दैवाने काही मुलांचेही बळी गेलेत. मागील काही महिन्यात नागरिकांचा भर दिवसा घराबाहेर पडण्याचं धाडस होत नाही. आता हेच बिबटे माणसांवरही हल्ले करत आहेत.

खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर यांसारख्या तालुक्यांमध्ये शेकडो तरुण मुलं आहेत. शिकलेली, सवरलेली, स्वतःच्या पायावर उभी असलेली, चांगली कमावणारी आहेत, त्यांच्या आई-वडिलांना आता फक्त एकच आस आहे: मुलाच्या डोक्यावर अक्षता पडाव्यात पण गावात मुलाचे स्थळ जुळले, तर मुलीचे आई-वडील “तुमच्या गावात बिबट्याचा प्रश्न आहे, आम्ही मुलगी देऊ शकत नाही”असा स्पष्ट नकार देतात. काही घरांमध्ये मुलं स्वतःच्या पायावर उभी राहिलेली आहेत,, त्यांना गावात प्रतिष्ठा आहे पण केवळ लग्नासाठी केवळ बिबट्याचा प्रश्न आडवा येतोय. स्वतःवर विश्वास ठेवून अनेक तरुण ठामपणे गावात, शेतात काम करत आहेत. पण त्यांच्या वैयक्तिक सुखाच्या, घरच्या शुभ क्षणांच्या वाटेवर ‘बिबट्याचा’ प्रश्न अजूनही मोठा अडसर ठरतोय.

या भागातील नागरिकांना बिबट्याच्या दहशतीमुळे आपलं रोजचं जीवन बदलून टाकावं लागतंय. मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना सततची धास्ती आहे. लग्न, उत्सव, मंगळागौर,या पारंपारिक सोहळ्यांमध्ये पूर्वीसारखी गर्दी, हसरे चेहरे दिसेनासे झालेत.बिबट्यांचा वावर आता रात्रीपुरता मर्यादित राहिला नाहीये. दिवसाढवळ्या ते लोकांवर, शेतजमिनीवर हल्ला करत आहेत. त्यामुळे भर दिवसा घराबाहेर पडणंही अवघड झालं आहे.परिस्थिती इतकी वाईट झाली आहे की, सुट्टीच्या दिवसात गावाला जाण्यासाठी अनेक पालक कचरतात, कारण लहान मुलांना सुरक्षित ठेवणंही कठीण झालं आहे.

एकीकडे पुणे शहर आयटी हब म्हणून ओळखले जाते, जागतिक स्तरावर विकासाची गाथा गात आहे आणि दुसरीकडे, त्याच्या अगदी शेजारील ग्रामीण भागात लोक आपल्या मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी सोयरीक नाकारत आहेत. हा निसर्गाच्या वाढत्या अतिक्रमण आणि मानवी वस्तीत वन्यजीवांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे निर्माण झालेला एक गंभीर सामाजिक प्रश्न आहे.

सरकार आणि वनविभागाने या प्रश्नाची तात्काळ दखल घेणे गरजेचे आहे. फक्त बिबट्यांना पकडून एका ठिकाणाहून दुसरीकडे सोडणे हा उपाय नाही, तर बिबट्या आणि मनुष्य यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी ठोस, दीर्घकालीन उपायांची गरज आहे.

About The Author

SHARE THIS POST :

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest