JJ Hospital Shootout

JJ Hospital Shootout:मुंबईला हादरवणारे हत्याकांड! ३२ वर्षांनी येणार सत्य बाहेर

News Political News Trending

१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र होते, नर्सेस अर्थात परिचारिकाही रुग्णसेवेत गढलेल्या होत्या… एरवीही दिसणारे हे चित्र…. त्या सकाळी मात्र काही क्षणांतच पार बदलून गेले. रुग्णालयाच्या त्या वॉर्डमध्ये गोळ्यांचा वर्षाव झाला. अवघ्या काही सेकंदात ३३ गोळ्या झाडल्या गेल्या आणि संपूर्ण मुंबई या हत्याकांडाने हादरली.

Tulsi Vivah2025:गणेशाच्या शापामुळे राक्षसाशी झालेलं तुळशीचं लग्न!तरीही विष्णूंसह होतो तुळशीविवाह

पृथ्वीला मिळाला नवीन चांदोबा!नव्या अर्धचंद्राची गोष्ट वाचा सविस्तर

हळदणकरच्या हत्येसाठी…
पोलीस रेकॉर्डनुसार, अरुण गवळीचा विश्वासू साथीदार शैलेश हळदणकर मारेकऱ्यांचे लक्ष्य होता. हल्ल्याच्या काही दिवस आधीच एका चकमकीत तो जखमी झाला होता आणि पोलीस बंदोबस्तात त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हळदणकरच्या शेजारच्या खाटेवर गवळीचा आणखी एक साथीदार बिपीन शेरे हाही जखमी अवस्थेत दाखल होता. हळदणकरच्या जवळ दोन सशस्त्र पोलीस तैनात होते.

…आणि गोळीबार सुरू झाला
पोलिसांनी या प्रकरणी त्यावेळेस न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, त्या सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास काहीजण ‘हळदणकरला भेटायचंय’ असं सांगून वॉर्डमध्ये आत घुसले आणि क्षणभरातच त्यांनी स्वयंचलित बंदुका बाहेर काढून गोळीबार सुरू केला… हळदणकर आणि संरक्षणार्थ असलेले दोन्ही पोलीस या हल्ल्यात ठार झाले.

गुन्हेगारी जगतातील टोळीयुद्ध
पोलीस रेकॉर्डनुसार, गुन्हेगारी जगताचा इतिहास असे सांगतो की दाऊद इब्राहिम आणि अरुण गवळी पूर्वी एकत्रच काम करत होते. मात्र नंतर त्यांच्या टोळीमध्ये फूट पडली. ८० च्या दशकाच्या उत्तरार्धात ही फूट वाढत दोघेही एकमेकांचे कट्टर शत्रू झाले. एका बाजूस दगडी चाळ हे सत्ताबाह्य केंद्र उभे राहिले तर दुसरीकडे दाऊद दुबईतून मुंबईवर नियंत्रण ठेवून होता. संघर्षाची ठिणगी पडली ती, दाऊदचा मेव्हणा इब्राहिम पारकरच्या हत्येमुळे. पारकरच्या हत्येमागे गवळी टोळीच असल्याची दाऊदची शंका होती. त्याचा सूड उगवण्यासाठीच जेजे हत्याकांड घडवण्यात आलं, अशी माहिती तत्कालीन खटल्यामध्ये मुंबई पोलिसांनी न्यायालयात सादर केली होती.

३२ वर्षांनंतर पुन्हा तपास, पुन्हा पुरावे
या खटल्यामध्ये काही जणांना शिक्षाही झाली. पण तरीही हे प्रकरण मुंबई पोलिसांची पाठ सोडत नाही, अशीच अवस्था आहे. गेल्याच वर्षी २०२४ साली ऑक्टोबर महिन्यात या प्रकरणात त्रिभुवन रामपती सिंग ऊर्फ श्रीकांत राय उर्फ प्रधान याला उत्तर प्रदेशात अटक झाली. या प्रकरणात तब्बल ३२ वर्षांनंतर झालेली ही अटक होती. मुंबई पोलिसांसाठी हे यश आणि आव्हान दोन्हीही आहे.अजूनही या प्रकरणाचा निकाल लागलेला नाही. अशा वेळेस या घटनेचा तब्बल ३२ वर्षांनंतर पुन्हा तपास करून, पुरावे गोळा करत आरोपीला शिक्षा होईल, अशा पद्धतीने खटला पुन्हा उभा करणे हे मुंबई पोलिसांसाठी आव्हानच असणार आहे.

Leave a Reply