Jabari Khabari – Latest Marathi News | ताज्या बातम्या

HEADLINES

Navaratri 2025: राजमाता जिजाऊ साक्षात जगदंबेच्या कन्या! इतिहासात पहिल्यांदाच घडला देवीचा चमत्कार !

इतिहासात पहिल्यांदाच घडला देवीचा चमत्कार !

Navaratri 2025 : : छत्रपती शिवाजी महाराज हे समस्त भारतीयांचे आराध्यद्वैवत आहेत ! स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवरायांनी केली. पण शिवराय घडले ते राजमाता जिजाऊंमुळे ! जिजामाता यांचे संस्कार, प्रेरणा यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी इतिहास घडवला. पण तुम्हाला माहीत आहे का, राजमाता जिजाऊ या जगदंबामातेचा अंश आहेत? आदिशक्तीचा आशीर्वाद छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मितीसाठी लाभला होता. स्वराज्य स्थापनेसाठी महाराजांना दोन मातांचे आशीर्वाद लाभले. पहिली म्हणजे साक्षात जगदंबा तर दुसऱ्या म्हणेज त्यांच्या जन्मदात्या आईचा ‘जिजाऊंचा’.. विशेष म्हणजे जिजाऊंच्या जन्मकथेचा थेट संबंध हा जगदंबा मातेशी जोडलेला आहे. जाणून घेऊया काय आहे ही कथा…  

राजमाता जिजाऊ उत्तुंग ध्येयवादाने झपाटलेल्या होत्या, त्या चारित्र्यसंपन्न, विवेकी, दूरदर्शी आणि कर्तृत्वशालिनी होत्या. लखुजी जाधवांची कन्या, मालोजी राजांची सून आणि चार पातशाह्या खेळणाऱ्या शहाजी राजांची पत्नी अशी अनेक बिरुद त्यांच्या मागे असली तरी त्यांना आयुष्यभर संकटाशीच सामना करावा लागला. महाराष्ट्राच्या इतिहासात जिजाबाईंचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण, त्या फक्त स्वराज्यसंस्थापक शिवाजी महाराजांच्या आई नव्हत्या, तर त्या रयतेला मातेसमान होत्या. त्यांचे मूळ घराणे सिंदखेडच्या जाधवराव देशमुखांचे, श्रीमंत आणि धाडसी जहागीरदारांचे होते. 

कन्यारत्नासाठी माऊलीने केला नवस

जिजाबाईंचे वडील लखुजी जाधव हे निजामशाहीतील प्रभावशाली सरदार होते. लखुजी जाधवांना चार पुत्र होते. परंतु, त्यांना कन्या प्राप्ती झालेली नव्हती. त्यांच्या पत्नी म्हाळसाबाई (गिरिजाबाई) यांना त्याची खंत होती. आपल्याला मुलगी व्हावी, या अनावर इच्छेने त्यांनी सिंदखेडमधील त्यांच्या कुलस्वामिनीला-रेणुकेला नवस केला. त्यानंतर त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले ते म्हणजे जिजाऊ! पुत्रासाठी, वंशाला दिवा हवा म्हणून नवस करणारी माणसं समाजाच्या प्रत्येक वर्गात आणि प्रत्येक कालखंडात अस्तित्त्वात होती. परंतु, म्हाळसाबाईंच्या कन्यारत्नाने मात्र संपूर्ण इतिहासालाच कलाटणी दिली.

शाकंभरी पौर्णिमेला जिजाऊ अवतरली

म्हाळसाबाईंच्या पोटी जन्म पावलेल्या या कन्येने पहिला सूर्यकिरण पाहिला, तो शालिवाहन शक १५१८ च्या पौष पौर्णिमेला; म्हणजे शाकंभरी पौर्णिमेला! 

ज्येष्ठ लेखक विजयराव देशमुख यांनी ‘महाराजांच्या मुलखात’ या पुस्तकात दिलेला जिजाऊंच्या जन्मकथेचा संदर्भ: “….गिरजाबाईसाहेबांनी जगदंबेला नवस केला की, ‘ओटीत एखादी पोर दे.’ आणि केवढे आश्चर्य! १५९७ (इसवी) च्या पौषी पौर्णिमेस सूर्योदयासमयी लुकजींना कन्या रत्न प्राप्त झाले. पोर सुलक्षणी. मुखमंडळावर तेज असे की, जशी कडाडणारी वीजच! लुकजींचा आणि गिरजाऊंचा आनंद गगनात मावेना. लगबगीने गंगाधर शास्त्र्यांनी कुंडली मांडली. अवघेच हर्षभरित झाले. प्रत्यक्ष मतापूरची, तुळजापूरची जगदंबाच गिरजाऊचे पोटी आली होती ! अवघी कुळी पोरीने उद्धरली. लुकजींना धन्य धन्य वाटले. साखरपाने वाटीत लुकजींचा हत्ती चाळीस हजार वस्तीच्या सिंदखेडात झुलू लागला. वाड्यात ब्राह्मण अनुष्ठानी बसले. महाली मंत्रघोष सुरु झाले. भट-बंदी गर्जु लागले.

‘उदयोS स्तु अंबे !….’

यात तुळजापूरची जगदंबाच गिरजाऊचे पोटी आली, असं वर्णन करण्यात आलेलं आहे. माहूरची रेणुका देवी जाधव घराण्याची कुलस्वामिनी होती, त्यामुळे सिंदखेड राजामध्ये तिचे लहानसे मंदिर असणे आणि त्या ठिकाणी जाधवरावांच्या कुटुंबाची विशेष श्रद्धा असणे स्वाभाविक होते. म्हाळसाबाईंनी कन्यारत्नाच्या प्राप्तीसाठी याच रेणुका देवीला नवस केला होता. सिंदखेड राजातील रेणुका मंदिरातील मूर्तीची स्थापना लखुजी जाधव यांनी केली होती, असे स्थानिक परंपरेनुसार मानले जाते.

About The Author

SHARE THIS POST :

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest