Jabari Khabari – Latest Marathi News | ताज्या बातम्या

HEADLINES

Nepal Genz protest : बंदी उठवली ! नेपाळमधील genz ची social media क्रांती !

बंदी उठवली ! नेपाळमधील genz ची social media क्रांती !

Youth protests erupt in nepal over social media ban : नेपाळमध्ये सोशल मीडिया साइट्सवरील सरकारने घातलेल्या बंदीविरोधात तरुणांनी सोमवारी केलेल्या हिंसक निदर्शनांमुळे परिस्थिती बिकट झाली होती. पोलिसांच्या कारवाईत २० जणांचा मृत्यू झाला असून ३०० हून अधिक लोक जखमी झाले. दरम्यान, गृहमंत्री रमेश लेखक यांनी राजीनामा दिला आहे. परिस्थिती बिकट होताच, राजधानी काठमांडूमध्ये नेपाळी सैन्य तैनात करावे लागले. बानेश्वरमधील नवीन संसद संकुलाच्या आसपासच्या रस्त्यांचा ताबा लष्कराने घेतला आहे.

GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले

पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी मृत्यूंबद्दल दुःख व्यक्त केले. ‘शांततापूर्ण निषेधात काही अवांछित घटकांच्या घुसखोरीमुळे हिंसाचार झाला आणि सार्वजनिक मालमत्ता वाचवण्यासाठी सरकारला बळाचा वापर करावा लागला’,असा दावाही त्यांनी केला. सरकारचे उद्दिष्ट सोशल मीडिया साइट्सवर बंदी घालणे नाही, तर त्यांचे नियमन करणे आहे. त्यांनी १५ दिवसांत अहवाल सादर करणारी चौकशी समिती स्थापन करण्याची घोषणाही केली.

या निदर्शनानंतर नेपाळमधील सोशल मीडियावरील बंदी मागे घेतली आहे. माहिती आणि प्रसारणमंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग यांनी तातडीच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही घोषणा केली. सरकारने सोशल मीडियावरील बंदी मागे घेतली आहे आणि संबंधित एजन्सींना प्लॅटफॉर्म पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी आंदोलकांना निदर्शने संपवण्याचे आवाहनही केले.

काठमांडूमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह हजारो तरुणांनी ‘Gen Z ‘ च्या बॅनरखाली संसदेसमोर निदर्शने केली. यावेळी त्यांनी सरकारविरोधी घोषणा दिल्या. काही निदर्शक संसदेच्या आवारात घुसले तेव्हा पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी पाण्याच्या, अश्रूधुराचा आणि रबर गोळ्यांचा वापर केला.

राष्ट्रीय ट्रॉमा सेंटरमध्ये आठ, एव्हरेस्ट आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी तीन, काठमांडू मेडिकल कॉलेजमध्ये दोन आणि त्रिभुवन टीचिंग हॉस्पिटलमध्ये एकाचा मृत्यू झाला. एकूण ३४७ हून अधिक जखमींवर देशभरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. अनेक मोठ्या रुग्णालयांमध्ये जागा कमी पडत आहेत. रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये पाठवले जात आहे.

तरुणाईचा विजय

नेपाळच्या इतिहासात पहिल्यांदाच ही घटना घडली आहे. सोशल मीडियावर बंदी घालणे हे तरुणाई-नागरिकांच्या अभिव्यक्तीवर घाला घालण्यासारखे होते. त्यामुळे सर्वांनी एकत्र येत सरकारविरुद्ध निदर्शने-आंदोलने केली . यात जाळपोळ-दगडफेकीसारख्या हिंसक घटनाही घडल्या. २० जणांना आपला जीवही गमवावा लागला. पण या लढ्याच्या शेवटी गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला, तसेच माहिती आणि प्रसारणमंत्र्यांनी सोशल मीडियावरील बंदी उठवली. हा तरुणाईचा विजयच आहे.

About The Author

SHARE THIS POST :

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest