का आली इंग्रजांना त्यांच्याच देशात स्वातंत्र्य मागण्याची वेळ?? UK मध्ये इमिग्रेशन विरोधात मोर्चा

News Trending

जगभरातील बदलत्या परिस्थितीत (Immigration) स्थलांतर हा मोठा आणि संवेदनशील विषय ठरत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या इंग्रजांनी कधीकाळी भारतासह जगातील अनेक देशांना गुलाम बनवले, तेच इंग्रज आता आपल्या देशात “स्वातंत्र्य द्या, देश परत द्या” अशा घोषणा देत आहेत. ब्रिटनमध्ये गेल्या काही महिन्यांत झालेल्या आंदोलनांतून एकच संदेश स्पष्ट दिसतो – वाढत्या स्थलांतराविरोधात स्थानिकांचा रोष.

स्थलांतराविरोधी हा मोर्चा शनिवारी काढण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्व इमिग्रेशनच्या विरोधात असलेले कार्यकर्ते टॉमी रॉबिन्सन यांनी केले. आंदोलनादरम्यान अनेक पोलिस अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला. “Unite The Kingdom” या नावाखाली हा निषेध आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सुमारे 1 ते दीड लाख लोक सहभागी झाले होते.

ब्रिटनमधील हॉटेल्सबाहेर निदर्शने करून मोर्चाला सुरूवात करण्यात आली. या मोर्चात सहभागी झालेल्या लोकांनी युनियन जॅक आणि लाल-पांढऱ्या सेंट जॉर्ज क्रॉसचे झेंडे फडकावले. यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या विरोधी घोषणाबाजी करण्यात आली. प्रामुख्याने “कीअर स्टार्मर इज अ वँकर” हे गाणे आंदोलकांनी गायले.

UK मध्ये आंदोलन आणि घोषणाबाजी
लंडनसह अनेक शहरांत गेल्या काही आठवड्यांत हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून “Stop the boats”, “Send them home”, “We want our country back” अशा घोषणा दिल्या. यामध्ये मुस्लिम स्थलांतरितांचा मुद्दा ठळकपणे पुढे आला. स्थानिकांना वाटते की मोठ्या प्रमाणावर होणारे स्थलांतर त्यांचा रोजगार, संस्कृती आणि सुरक्षिततेस धक्का देत आहे. या चळवळीला टॉमी रॉबिन्सन सारखे उजव्या विचारसरणीचे नेते चालना देत आहेत. यामध्ये सुप्रसिद्ध एलन मस्क यांनी देखील सहभाग नोंदवत UK मध्ये युरोपियन लोकसंख्या बदलून टाकली जात आहे आणि प्रमाणाबाहेर होत असलेल्या स्थलांतरामुळे ब्रिटनचा नाश होत आहे, अशा प्रकारचे भाषण केले आहे.

मोर्चादरम्यान झालेल्या एका संगित कार्यक्रमात “Making The West Look Like The Middle East” अशा प्रकारच्या ओळी गाण्यात आल्या. यावेळी आंदोलनकर्त्यांनी मुस्लिम, इस्लामिक स्टेट आणि पॅलेस्टाईन यांचे झेंडे दाखवून त्यांना जोरदार शिव्या घालत त्यांचे झेंडे फाडून जमिनीवर फेकले. रॉबिन्सन यांनी आंदोलकांना प्रोत्साहन देत ब्रिटिश माणसे जागृत झाले असल्याचे म्हटले.

भारतीयांवरील परदेशातील धोके
जगभरातील सुमारे ३ कोटींहून अधिक भारतीय परदेशात राहतात. त्यामध्ये अमेरिकेत IT क्षेत्रात, गल्फ देशांत कामगार वर्गात आणि युरोपमध्ये विद्यार्थी व व्यावसायिक म्हणून भारतीय मोठ्या संख्येने आहेत. पण गेल्या काही वर्षांत त्यांच्या जीवावर उठलेल्या घटनांची संख्या वाढली आहे.

सर्वात अलीकडील आणि धक्कादायक घटना म्हणजे आयर्लंडमध्ये एका भारतीयाची झालेली निघृण हत्या. स्थानिक तरुणांच्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. या आधीही ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया व अमेरिकेत भारतीयांवर हल्ल्यांच्या बातम्या समोर आल्या आहेत. काही वेळा हे हल्ले लूटमारसाठी तर काही वेळा वर्णद्वेष व नोकऱ्या हिसकावून नेल्याच्या रागातून घडलेले आहेत.

Leave a Reply