दगडाला रूप देणारे शिल्पमहर्षी राम सुतार !

News

एका सामान्य घरात जन्मलेल्या मुलाने स्वप्न पाहिलं इतिहासाला शिल्पात बंदिस्त करण्याचं!
हातात हातोडा आणि छिन्नी घेतली… आणि पाहता पाहता त्याने दगडांना रूप दिलं, इतिहासाला चेहरा दिला, आणि संस्कृतीला नव्या उंचीवर नेलं. ही गोष्ट दुसरी कोणाची नसून गेली १०० वर्ष आपली शिल्पकलेची साधना अखंडपणे सुरू ठेवत, नव्या कल्पनांना मूर्तरूप देणारे ज्येष्ठ शिल्पकार पद्मभूषण राम सुतार.

१९ फेब्रुवारी १९२५ रोजी धुळ्याच्या गोंडूर गावात एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या राम सुतार यांनी आपल्या मेहनतीने जगभर लौकिक मिळवला. मुंबईतील ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’ येथे त्यांनी शिल्पकलेचे शिक्षण घेतले. त्यांच्या सरकारी सेवेत अजिंठा-वेरुळ येथील शिल्पांच्या डागडुजीसह पंचवार्षिक योजनांची लघुशिल्पे घडवण्याची जबाबदारी होती. मात्र, १९६० पासून स्वतंत्रपणे कार्य करण्याचा निर्णय घेत त्यांनी स्वतःचा स्टुडिओ स्थापन केलं.

त्यांच्या कुशल हातांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या शिल्पकृतींनी भारतीय जनमानसाला प्रेरित केले. त्याचबरोबर मौलाना आझाद (१८ फूट), इंदिरा गांधी (१७ फूट), राजीव गांधी (१२ फूट), गोविंदवल्लभ पंत (१० फूट) आणि जगजीवनराम (९ फूट) या महान नेत्यांचे भव्य शिल्प संसद भवनाच्या आवारात उभे केले. फ्रान्स, इटली, अर्जेंटिना, रशिया, इंग्लंड या देशांमध्येही त्यांची शिल्पकला आदराने उभी आहे.

गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंच ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ स्मारक असो वा मुंबईतील इंदू मिलमध्ये उभारल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील भव्य मूर्तीचे शिल्प असो, राम सुतार आजही १०० व्या वर्षातही अविरत कार्यरत आहेत. त्यांचे अद्वितीय योगदान पाहता शिल्पकलेच्या युगपुरुषाला महाराष्ट्र सरकारने २०२४ चा ‘महाराष्ट्र भूषण’ हा राज्यातील सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर केला आहे. हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या कलेला दिलेली सन्मानाची शिल्पमुद्रा !

काही दिवसांपूर्वीच केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून २०१६ चा ‘टागोर पुरस्कार’ जाहीर झाला होता आणि आता ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या कार्याचा आणखी गौरव झाला आहे.

राम सुतार हे केवळ शिल्पकार नाहीत, तर भारतीय संस्कृतीचे मूर्त स्वरूप घडवणारे युगपुरुष आहेत. त्यांच्या कुशलतेने घडलेली शिल्पे युगानुयुगे इतिहासाचे साक्षीदार राहतील. त्यांच्या कार्याला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने नवे सोनेरी पान मिळाले असून, भारतीय शिल्पकलेच्या इतिहासात त्यांचे योगदान अजरामर राहील.

Leave a Reply