“कशाला हवेत मोडके पुल” पहिल्याच महाराष्ट्र भूषण सोहळ्यात पडली होती वादाची ठिणगी

1996 साल… शिवसेना – भाजप युतीचे सरकार. महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असावा ही संकल्पना प्रत्यक्षात येत होती. विशेष म्हणजे “महाराष्ट्र भूषण” हा पुरस्कार सुरू व्हावा यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वत: आग्रही होते. तसेच पहिला सन्मान अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु.ल. देशपांडे यांना मिळावा, अशी आग्रही शिफारस देखील त्यांनी केली होती. मात्र या पुरस्कारानंतर वेगळच राजकारण घडलं, ज्याबद्दल आजही त्याबाबत अनेकदा चर्चा होते.

महाराष्ट्र सरकारने पहिला पुरस्कार पु.ल. देशपांडे यांना जाहिर केला. पु.ल.देशपांडे यांनी पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी आपल्या मिश्किल शैलीत सरकारवर टोकदार टीका केली. निवडून आलेले पक्ष लोकशाहीपेक्षा ठोकशाही पसंत करतात, असं विधान त्यांनी व्यासपीठावरून केलं. प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या हे विधान थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर असल्याचं बोललं गेल. साहजिकच बाळासाहेबांच्या हे जिव्हारी लागलं.

पुरस्कार सोहळ्याच्या दोन दिवसांनंतर एका उड्डाणपुलाच्या उद्धाटनावेळी त्यांनी पुलांचा उल्लेख “मोडके पूल” असा केला. आम्ही ठोकशाहीवाले आहोत तर आमचा पुरस्कार कशाला स्वीकारता? असा सवाल करत त्यांनी झक मारली अन् पुलंना पुरस्कार दिला असे जळजळीत उद्गार काढले. त्यांनतर “सामना” मध्ये “कशाला हवेत मोडके पुल” अशा शीर्षकाचा अग्रलेख छापून पुलंवर जोरदार टीका करण्यात आली.

पुलं आणि बाळासाहेब यांचे नाते तसे फार जुणे होते. ज्या शाळेत बाळासाहेबांचे शिक्षण झाले, तिथे पु.ल शिक्षक होते. हा जुना ऋणानुबंध राजकारणापेक्षा मोठा ठरला. काही दिवसांनी झालं गेलं सगळ विसरून पुलंच्या पुण्यातील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तिथे बाळासाहेबांनी पुलंची नतमस्तक होऊन माफी मागितली आणि त्यांच्यातील वाद कायमचा मिटवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *