पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी दिल्लीतील लाल किल्ला येथे तिरंगा फडकावला. त्यानंतर त्यांनी राष्ट्राला संबोधित केले. यावेळी त्यांनी भारताविरूद्ध कुरापती करणाऱ्या शत्रू देशा पाकिस्तानची कानउघडणी केली. काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचे उत्तर म्हणून भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जलकरार (Indus Water Treaty) स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. भाषणादरम्यान त्यांनी याविषयावर देखील टिपण्णी केली.
पाकिस्तानी पंतप्रधान व त्यांचे अनेक नेते सिंधू पाणी करार पुन्हा सुरू करण्याबद्दल बोलत होते. मात्र मोदी यांनी पाकिस्तानला स्पष्ट इशारा देत, “यापुढे रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही. पाकिस्तानने भारताविरोधी कारवाया थांबवल्या नाहीत, तर सिंधू जलकरार कायम स्थगित राहील असा इशारा दिला आहे. पुढे, सिंधू जलकरार हा भारतीयांसाठी अन्यायकारक आणि एकतर्फी आहे. भारतात उगम पावणाऱ्या नद्यांच्या पाण्याचा वापर करून शत्रू देशातील शेतकरी पिकं काढतायत आणि आपल्याच देशातील शेतकरी मात्र दुष्काळाचा सामना करतोय, असे म्हणाले.
“या जलकराराने आपल्या देशाच सात दशकांपासून प्रचंड नुकसान केलेलं आहे. या पाण्यावर केवळ भारताचा व इथल्या शेतकऱ्यांचा अधिकार आहे. हा करार भारताचा शोषण करणारा आहे आणि हे भारत सात दशकांपासून सहन करत आला आहे. मात्र आता हे भारत स्वीकारणार नाही आणि सहनही करणार नाही. आम्ही आता दहशतवाद आणि दहशतवाद्यांना पोसणारे, आश्रय देणारे आमच्यासाठी सारखेच आहेत. अणुबॉम्ब हल्ल्याच्या नावाखाली भारताला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करू नका. जर शत्रूने असाच कारभार सुरू ठेवला, तर लष्कर त्यांच्याविरोधात योग्य निर्णय घेईल, आणि तो आमच्या अटी, शर्तींवर होईल,” असा इशारा नरेंद्र मोदी यांनी दिला.
पंतप्रधानांच्या या भाषणाने सिंधू जलकरार, दहशतवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेविषयी भारताची कठोर भूमिका पुन्हा अधोरेखित झाली. लाल किल्ल्यावरून आलेला हा संदेश केवळ पाकिस्तानलाच नव्हे, तर संपूर्ण जगाला भारताच्या निर्धाराची जाणीव करून देणारा ठरला.
