Bomb Blast Threats to Mumbai Police: आज अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने मुंबईसह राज्यभरात गणपती विसर्जनाची लगबग असताना मुंबईला बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली होती. शुक्रवारी वाहतूक पोलिसांना ३४ वाहनांमध्ये मानवी बॉम्ब आणि ४०० किलो आरडीएक्स पेरल्याचा संदेश प्राप्त झाला होता. अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर धमकी मिळाल्याने पोलीस प्रशासन सतर्क झाले होते. अखेर हे विघ्न आता दूर झाले आहे. उत्तर प्रदेशमधील नोएडा पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक केली असून त्याला आता पुढील चौकशीसाठी मुंबईला आणले जात आहे.
नोएडा पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव अश्विन कुमार सुप्रा (वय ५०) आहे. तो मूळचा बिहारचा असून मागच्या पाच वर्षांपासून नोएडात राहत आहे. धमकी देण्यासाठी आरोपीने वापरलेला फोन आणि सीम कार्ड जप्त करण्यात आले आहे. मुंबई पोलीस आता या प्रकरणाची पुढील चौकशी करतील.
आरोपीला नोएडातील सेक्टर ११३ मधून ताब्यात घेण्यात आले. आरोपीने सांगितलेले की, तब्बल ३४ मानवी बॉम्ब मुंबईत असून ४०० किलो RDX ने १ कोटी लोक मारण्यात येतील. या इशाऱ्यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने संबंधित यंत्रणेला माहिती दिली. तसेच सर्व पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश दिले होते.
पण बॉम्बची धमकी का ?
एफआयआरमध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार अश्विनने त्याचा मित्र फिरोजला अडकविण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांना बॉम्बस्फोटाची धमकी दिली होती. २०२३ मध्ये पाटण्याच्या फुलवारी शरीफमध्ये फिरोजने दाखल केलेल्या तक्रारीनंतर अश्विनला तीन महिने कारावास भोगावा लागला होता. याचा सूड उगविण्यासाठी अश्विनने फिरोजच्या नावाने मुंबई वाहतूक पोलिसांच्या क्रमांकावर धमकीचा संदेश पाठवला, अशी माहिती समोर येत आहे.
