भारताचा स्वातंत्र्यपूर्व काळ. तेव्हा फोन नव्हते, ना कुठलं सोशल मिडिया. रोजचा पेपर सकाळी तसाही उशिराच यायचा. त्यामुळे घरातल्या त्या एका लाकडी बॉक्सवर सगळ्यांचे कान टवकारलेले असायचे. एक धून वाजायची आणि सुरू व्हायचा ऑल इंडिया रेडिओचा आवाज!
१९३४ चा तो काळ हिटलरच्या दहशतीने गाजत होता. ज्यू लोकांवरील वाढत्या अत्याचाराच्या बातम्या जगाला अस्वस्थ करत होत्या. जर्मनीमधून रेफ्युजींचे लोंढे मुंबईमध्ये येत होते. त्यात एक २७ वर्षांचा तरुण व्हायलिन आणि म्युझिकल नोट्सचे कागद असलेली सुटकेस घेऊन भारतात आला. डोळ्यांत काळजी दिसत असली तरी मनात उमेद होती. त्याचं नाव होतं वॉल्टर कॉफमन. युरोपियन संगीतावर अतोनात प्रेम असलेल्या वॉल्टर कॉफमन यांनी मुंबईमध्ये आल्यावर छोटे छोटे ऑर्केस्ट्रा चालू केले. त्यांच्या या कलेमुळे त्यांना मुंबईच्या प्रतिष्ठित समाजात नावाजले जाऊ लागले. युरोपियन संगीताचा पगडा असला तरी त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचासुद्धा अभ्यास सुरु केला. भारतभर फिरून त्यांनी रागदारी व लोकसंगीताचा धडे घेतले. तेव्हा ऑल इंडिया रेडिओ (आकाशवाणी) नुकतंच आकार घेत होतं. १९३६ साली रेडिओ स्टेशन सुरू करताना एका सिग्नेचर ट्यूनची गरज होती. ही जबाबदारी सोपवण्यात आली वॉल्टर कॉफमन यांच्यावर.
कॉफमन विचार करू लागले… अशी कोणती धून असेल जी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वांना आपली वाटेल? त्यांनी व्हायोलिन उचललं, पण त्यात आत्मा फुंकला तो भारतीय राग शिवरंजनीचा. स्टुडिओमध्ये एकीकडे तंबोऱ्याचा संथ आवाज सुरू झाला आणि त्यावर कॉफमन यांच्या मार्गदर्शनाखाली व्हायोलिनच्या तारा छेडल्या गेल्या. यामध्ये तंबोरा, सनई आणि व्हायोलिनचा जो मिलाफ आहे, तो आजही जगातील सर्वोत्तम ‘ब्रॉडकास्ट ट्यून’ मानला जातो.
कॉफमन यांनी केवळ रेडिओवरच काम केले नाही, तर त्यांनी मुंबईत पाश्चात्य संगीताचा प्रसार करण्यासाठी ‘बॉम्बे चेंबर म्युझिक सोसायटी (Bombay Chamber Music Society)’ स्थापन केली. आजही मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) मध्ये जो संगीताचा वारसा दिसतो, त्यात कॉफमन यांच्या शिकवणीचा फार मोठा वाटा आहे.
१९४६ मध्ये कॉफमन ना BBC लंडन मधल्या नोकरीमुळे भारत सोडावा लागला. नंतर पुढे ते कायमचे अमेरिकेत स्थायिक झाले. त्यांनी परदेशात गेल्यावरही भारतीय रागांवर संशोधन चालू ठेवलं. ज्या माणसाला स्वतःचा देश सोडावा लागला, त्याने दुसऱ्या देशाला आपली ‘ओळख’ दिली. आजही, इतकी दशके उलटूनही, आकाशवाणीने या धूनमध्ये कोणताही बदल केलेला नाही हाच त्यांच्या प्रतिभेचा मोठा सन्मान म्हणता येईल.



