Don arun gawali released on bail : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एका सभेत तुमचा दाऊद असेल, तर आमच्याकडे गवळी आहे, असं म्हटलेलं. दाऊदच्या तोडीस तोड ‘डॅडी’ म्हणजेच अरुण गवळी यांची नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेच्या शिक्षेतून सुटका केली. भारतामध्ये आमदाराला शिक्षा होणं, तेही थेट जन्मठेप होणं, ही दुर्मीळ घटना. पण महाराष्ट्राच्या राजकारणात ही घटना घडली आणि नुसती जन्मठेप नाही, तर ती एका राजकीय नेत्याची हत्या केली म्हणून झालेली जन्मठेप होती.
हा आमदार होता अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी आणि त्यानं ज्याची हत्या केली ते होते शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर.
अरुण गवळी मुंबई-महाराष्ट्रासह भारताला परिचित आहे, तो गुन्हेगारी जगतातील त्याच्या क्रूरकर्मांमुळे. मुंबईतल्या गुन्हेगारी जगतात ज्यावेळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचं वर्चस्व होतं, त्याचवेळी दुसरीकडे अरुण गवळीच्या दगडी चाळीचंही वर्चस्व वाढलं होतं. या वर्चस्वाला चाप लागला तो २००7 मध्ये झालेल्या कमलाकर जामसंडेकर हत्याप्रकरणामुळे.
काय आहे हे प्रकरण ?
२ मार्च २००७ या दिवशी संध्याकाळी पावणेपाचला मुंबईतल्या घाटकोपरमध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर दिवसभरातली कामं संपवून त्यांच्या घरात टीव्ही पाहात होते. असल्फा व्हिलेजच्या रुमानी मंजिल चाळीत ते राहात होते. कमलाकार जामसंडेकर यांनी त्यावेळी अखिल भारतीय सेनेचे उमेदवार अजित राणेंचा ३६७ मतांनी पराभव केला होता. कमलाकार जामसंडेकर यांच्या पत्नी कोमल या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. जामसंडेकर यांची भाची मनाली हिरे स्वयंपाक घरात काम करत होती. इतक्यात घराबाहेर दोन मोटरसायकल येऊन थांबल्या होत्या. त्यावरुन चार लोक उतरले. त्यातला एकजण हा जामसंडेकर यांच्या घराकडे आला आणि त्यांच्या घरात शिरला. त्याने त्याच्याकडच्या बंदुकीने जामसंडेकर यांच्यावर पिस्तुलाने गोळीबार केला. हा गोळीबार अत्यंत जवळून म्हणजेच ‘पॉईंट ब्लँक रेंज’वरुन करण्यात आला. गोळीबार झालेला पाहून मनाली धावत बाहेर आली तेव्हा कमलाकार जामसंडेकर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले तिला दिसले. तिने मदतीसाठी धावा केला. जामसंडेकर यांच्यावर गोळीबार झाल्याचं कळताच गर्दी जमा झाली. त्या गर्दीचा फायदा घेऊन हल्लेखोर तिथून पळाले. जामसंडेकर बेशुद्ध पडले होते. रक्ताने माखलेल्या कमलाकर जामसंडेकरांना राजावाडी हॉस्पिटलमध्ये नेलं, पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला. कमलाकर जामसंडेकर हे शिवसेनेचे नगरसेवक होते. राजकीय व्यक्तीची दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येनं मुंबई हादरली.
हत्येचा तपास कसा सुरु झाला?
यानंतर या हत्येचा तपास सुरू झाला. मात्र, पोलिसांच्या हाती सुगावा लागत नव्हता. मात्र, जो सुगावा लागला तो इतका मोठा की, त्यातून पुढे आलेली माहिती पुन्हा एकदा हादरवणारी होती. कारण या हत्येचे धागेदोरे पोहोचले होते, एका आमदरापर्यंत आणि गुन्हेगारी विश्वाच्या अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीपर्यंत.
साकीनाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोतीराम कासार यांच्या नेतृत्त्वात घटनास्थळी पंचनामा करण्यात आला.यावेळी पोलिसांनी घटनास्थळाचे फोटो काढले. तिथं पोलिसांना बंदुकीचा तुकडाही सापडला.यानंतर तपासाला सुरुवात झाली. यादरम्यान पोलिसांनी प्रताप गोडसे, अजित राणे, प्रकाश सावला, सुभाष उपाध्याय, पंकज कोठारी, मोहम्मद सैफ मोहिद्दीन फारूकी आणि बदरेआलम बद्रुद्दीन फारुकी यांना अटक केली.
कमलाकर जामसंडेकरांच्या शवविच्छेदन अहवालात आढळलं की, त्यांच्या डोक्यात गोळ्या घुसल्या होत्या. तसंच, बंदुकीच्या गोळ्यांवरून ही बंदूक 12 बोअर कंट्री मेड हँडगन आहे हेही समोर आलं. तपासाअंती पोलिसांनी मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात आरोपपत्र दाखल केलं आणि त्यात सहा जणांना आरोपी म्हणून नोंदवलं.
तुटलेल्या ट्रिगरनं लागला हत्येचा सुगावा
कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणाचा पहिला सुगावा मुंबई पोलिसांना हत्येच्या वर्षभरानंतर म्हणजे 2008 साली लागला. 26 एप्रिल, 2008 ला पोलीस निरीक्षक सांडभोर यांना माहिती मिळाली की, काळबादेवीच्या ज्वेलरी शॉपमध्ये काहीजण दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार मग पोलिसांनी सापळा रचला आणि या सापळ्यात 26 एप्रिल 2008 ला हॉटेल गोविंदराममधून दुपारच्या सुमारास पोलिसांनी विजय गिरी, अशोककुमार जयस्वाल, नरेंद्र गिरी आणि अनिल गिरी यांना ताब्यात घेतलं.
या अटक केलेल्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे बंदूक सापडली. या बंदुकीचं ट्रिगर तुटलं होतं. ताब्यात घेतलेल्यांपैकी अशोककुमार जयस्वाल, विजय गिरी आणि नरेंद्र गिरी हे जामसंडेकरांवर गोळ्या झाडणाऱ्यांमधील होते.नंतर क्राइम ब्रांचच्या ताब्यात असलेल्या आरोपींनी जप्त पिस्तूल कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येत वापरल्याची कबुली दिली. तसंच, तुटलेलं ट्रिगर घटनास्थळी फेकल्याची माहितीही दिली.
त्यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी जप्त केलेला मुद्देमाल तपासला. त्यांना तुटलेलं ट्रिगर मिळालं आणि कमलाकर जामसंडेकर हत्येच्या तपासाला वाऱ्याचा वेग मिळाला. कारण जामसांडेकरांची हत्या याच आरोपींनी केल्याचा सबळ पुरावा मुंबई क्राईम ब्रांचच्या हाती लागला होता. कमलाकर जामसंडेकरवर गावठी कट्ट्यानं गोळ्या झाडल्याची विजय गिरीने माहिती दिली, असं क्राईम ब्रांचनं सेशन्स कोर्टात सांगितलं. तत्कालीन तपास अधिकारी नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात की आम्हाला संशयित शूटर्स मिळाले होते.
अरुण गवळीपर्यंत धागेदोरे कसे पोहोचले?
अटकेतील आरोपींच्या चौकशीतून दोन नवी नावं पुढे आली, ती म्हणजे प्रताप गोडसे आणि अजित राणे. यातील प्रताप गोडसे हा अरुण गवळीचा राजकीय पक्ष असलेल्या अखिल भारतीय सेनेचा कार्यकर्ता होता, तर अजित राणे हा अखिल भारतीय सेनेचा नेता होता. या अजित राणेने 2007 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत कमलाकर जामसंडेकर विरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत जामसंडेकरनी अजित राणेचा अवघ्या 367 मतांनी पराभव केला होता.
यानंतर पोलिसांनी प्रताप गोडसेला ताब्यात घेतलं. त्यानंतर या हत्येसाठी 30 लाख रुपयांची सुपारी सदाशिव सुर्वे आणि साहेबराव भिंताडेने दिल्याचं समोर आलं. सुर्वे स्थानिक बांधकाम व्यवसायिक, तर साहेबराव भिंताडे जामसांडेकरांचे माजी सहकारी होते.
सेशन्स कोर्टाने आरोपींना शिक्षा ठोठावताना आदेशात म्हटलंय की, “पोलीस चौकशीत सदाशिव सुर्वेंचा जामसंडेकरांशी जागेवरून वाद सुरू होता. त्यामुळे सुर्वेंनी साहेबराव भिंताडेंसोबत संगनमताने या हत्येचं षडयंत्र रचलं.”
नाव न घेण्याच्या अटीवर क्राइम ब्रांचचे अधिकारी पुढे सांगतात की, “जामसंडेकर यांच्या हत्येसाठी सुर्वे आणि भिंताडे यांनी प्रताप गोडसे आणि अजित राणे यांच्याशी संपर्क केला. प्रताप गोडसे आणि अजित राणे गवळी टोळीशी संबंधित असल्याचा पोलिसांनी कोर्टात दावा केला होता. राजकीय वैमनस्यामुळे सदाशिव सुर्वे आणि साहेबराव भिंताडे यांनी कमलाकर जामसंडेकर यांना मारण्यासाठी सुपारी दिली होती.”
अरुण गवळीचा नेमकी भूमिका काय होती?
प्रताप गोडसे आणि अजित राणे यांनी सुपारी घेतल्यानंतर जामसंडेकरची हत्या रचण्याच्या या कटात अरुण गवळीचा प्रवेश झाला. तपास अधिकारी सांगतात, “प्रताप गोडसे अरुण गवळीच्या दगडी चाळीतील कार्यालयात संदीप गांगणला भेटला. संदीप अखिल भारतीय सेनेच्या दगडी चाळीतील कार्यालयाचा प्रमुख होता. त्यांनी संदीप गांगणला पैसे आणले असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांची भेट अरुण गवळीचा अत्यंत विश्वासू सुरेश पाटीलसोबत झाली.”
सदाशिव सुर्वे आणि साहेबराव भिंताडे दगडी चाळीत येऊन अरुण गवळीला भेटले. अरुण गवळी त्यावेळी भायखळा मतदारसंघाचे आमदार होते. मुंबई पोलिसांनी कोर्टात दाखल आरोपपत्रानुसार, अरुण गवळीला कमलाकर जामसांडेकरांची हत्या करण्यासाठी 30 लाख रूपये दिले. अरुण गवळींनी काम होईल असा विश्वास सुर्वे आणि भिंताडे यांना दिला.
जामसांडेकरांच्या हत्येसाठी शूटर्स प्रताप गोडसेने आणले होते. पण हत्येचा शेवटचा आदेश अरुण गवळीने दिला होता. त्यामुळे क्राइम ब्रांचच्या टीमने अरुण गवळीला 21 मे 2008 दगडी चाळीतून अटक केली. त्यावेळी अरुण गवळी मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघाचा आमदार होता.त्यानंतर सदाशिव सुर्वे आणि भिंताडे यांनादेखील अटक करण्यात आली. 27 जुलै 2008 ला मुंबई पोलिसांनी सर्व आरोपींना मकोका म्हणजेच महाराष्ट्र ऑर्गनाईड क्राइम कंट्रोल अॅक्ट लावला.
सेशन्स कोर्टामध्ये खटल्यादरम्यान अरुण गवळीच्या वकिलांनी त्याच्यावर असलेले आरोप खोटे असल्याचा दावा केला होता. मात्र, तो दावा न्यायालयाच्या पटलावर टिकू शकला नाही आणि अरुण गवळी आणि इतर 11 जणांना दोषी ठरवलं.
गवळीला जन्मठेपेची शिक्षा
कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणी मुंबई सेशन्स कोर्टाने अरुण गवळी आणि इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर सबळ पुराव्याअभावी सुरेश पांचाळ, दिनेश नारकर आणि गणेश साळवी या तीन आरोपींना दोषमुक्त केलं. या प्रकरणात सरकारी वकील राजा ठाकरे यांनी हे प्रकरण दुर्मिळात दुर्मीळ आहे असे नमूद करत, दोषी आरोपींना फाशी ठोठावण्याची मागणी केली. मात्र, सरकारचा हा दावा न्यायालयाने फेटाळला. हे प्रकरण संघटित गुन्हेगारीचा भाग असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने जन्मठेप ठोठावली.
सेशन्स कोर्टाच्या या शिक्षेविरोधात अरुण गवळीने हायकोर्टात अपील केलं. पण हायकोर्टानेही अरुण गवळी आणि इतर आरोपींची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली होती . या प्रकरणातील एक प्रमुख आरोपी सदाशिव सुर्वे याचा साल 2012 मध्ये तुरुंगातच मृत्यू झाला.
