Dasara and shivaji park

Dasara Melava 2025: दसरा मेळावा म्हणजे शिवाजी पार्क! बाळासाहेबांच्या मेळाव्याचं अटळ समीकरण;वाचा सविस्तर

News

Dasara melava history 2025:दरवर्षी गणपती झाल्यावर चर्चा सुरु होते नवरात्र आणि त्यानंतर होणाऱ्या दसऱ्या मेळाव्याची. दसरा मेळावा हा सणापेक्षा महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा जास्त ठरतो. रा. स्व. संघाची स्थापना १९२५ रोजी विजयादशमीच्या दिवशी झाली. तेव्हापासून संघाकडून दसरा मेळावा आयोजित करण्यात येतो. विशेष संचलन आणि सरसंघचालकांचे भाषण यावेळी होते. संघाचा दसरा मेळावा जसा आकर्षणाचा बिंदू असतो, तसाच शिवसेनेचा! बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून वर्षभराची राजकीय स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी या दसरा मेळाव्याचं आयोजन केलं जात असे. तर पाहूया कधी आणि कसा झालेला शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा! शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा यांचे काय आहे समीकरण

शिवसेनेचा दसरा मेळावा हा कायमच चर्चेत राहिला आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा घेण्याची परंपरा ही बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केली होती. मात्र आज बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी उद्धव ठाकरेंनी फारकत घेतली असा आरोप करत एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या ४० आमदारांनी बंड पुकारलं. त्यामुळे शिवसेना दुभंगली आहे. शिवसेना दोन गटात विभागली गेल्याने शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होतात, एक उद्धव ठाकरेंचा आणि दुसरा एकनाथ शिंदे यांचा.

५६ वर्षांपूर्वी साजरा झाला होता पहिला दसरा मेळावा
पहिल्या दसरा मेळाव्याचे संदर्भ आपल्याला प्रकाश अकोलकर यांच्या जय महाराष्ट्र या पुस्तकात मिळतात. ३० ऑक्टोबर १९६६ या दिवशी शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा पार पडला. १९ जानेवारी १९६६ ला बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली. त्यानंतर आलेला हा पहिलाच दसरा मेळावा. त्यावेळी आपल्या शिवसैनिकांना साथीला घेऊन दसरा मेळावा घेण्याचा निर्णय घेतला. जाहीर सभा, मेळावे याऐवजी शिलंगणाचं सोनं लुटण्याचं निमंत्रण मराठी माणसाला बाळासाहेब ठाकरेंनी दिलं.

शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा यांचे काय आहे समीकरण
बाळासाहेबांचं शिवाजी पार्कवर प्रचंड प्रेम होतं. बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्क या दोघांचा जन्म एकाचवेळी झाल्याच खूप कमी जणांना माहिती आहे. शिवाजी पार्कला पूर्वी माइन पार्क असं संबोधलं जात होतं. 1927 साली या मैदानाचं नावं शिवाजी पार्क देण्यात आलं. याच साली बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला होता.

शिवसेनेच्या स्थापनेनंतरचा पहिलाच दसरा मेळावा
शिवसेनेच्या स्थापनेनंतरचा पहिला दसरा मेळावा ३० ऑक्टोबर १९६६ ला झाला. वर्तमानपत्रांनी या मेळाव्याला मुळीच प्रसिद्धी वगैरे दिलेली नव्हती. मार्मिकने आधीच्या तीन चार महिन्यात उभा केलेला माहोल शिवसेना या संघटनेच्या पाठिशी होता. त्यामुळे या मेळाव्यासाठी दुपारी चार वाजल्यापासून शिवाजी पार्कच्या दिशेने लोकांची गर्दी येऊ लागली. छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि शिवसेनेचा जयजयकार असो या घोषणा दिल्या जात होत्या.

पहिल्या दसरा मेळाव्यात स्टेजवर कोण होतं?
शिवसेनेच्या नेत्यांपैकी एकही जण पहिल्या दसरा मेळाव्याच्या स्टेजवर नव्हतं. बाळासाहेब ठाकरे हे मेळाव्याच्या अग्रभागी होते. त्यांचे बंधू श्रीकांत ठाकरे यांच्या साथीने स्थापन केलेल्या या संघटनेला आशीर्वाद देण्यासाठी प्रबोधनकार ठाकरेही जातीने उपस्थित होते. त्याशिवाय पुढे काँग्रेसमध्ये गेलेले आणि मंत्री झालेले रामराव आदिकही होते. अॅडव्होकेट बळवंत मंत्री आणि प्राध्यापक स.अ. रानडे हे सगळेही होते.

शाहीर साबळे यांचं महाराष्ट्रगीत
शाहीर साबळे यांनी आपल्या बुलंद आवाजात महाराष्ट्र गीत जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा हे सुरू केलं. तोपर्यंत संपूर्ण शिवाजी पार्क मैदान गर्दीने फुलून गेलं होतं. महाराष्ट्राला आज खरी गरज आहे ती महाराष्ट्रवादाची! या शब्दात बाळासाहेब ठाकरेंनी भाषण सुरू केलं ज्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला.

शिवसेनेचं धोरणही बाळासाहेब ठाकरेंनी केलं जाहीर
पहिल्याच दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचं धोरणही सांगितलं. “आज महाराष्ट्राला राजकारणापेक्षा समाजकारणाची गरज आहे. त्यामुळे शिवसेना स्वतःला राजकारणापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेते आहे” असं बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर करत संघटनेचं धोरण जाहीर केलं. तसंच राजकारण हे गजकरणासारखं आहे असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले आणि एकच हशा पिकला. ही संघटना जातीयवादी नाही, कारण मराठी माणसाशी संकटकाळातही जो मैत्री करतो तोच मराठी असंही वक्तव्य बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या दसरा मेळाव्याच्या पहिल्या भाषणात केलं.

प्रबोधनकार ठाकरे यांनीही केलं भाषण
“आपल्याला शिवरांयांचं नाव घेऊन संकटांशी मुकाबला करायचा आहे. मराठी रक्त भ्रष्ट नाही, मराठी माणूस हा अन्यायाशी झगडायला तयार आहे हे आज तुम्ही दाखवून दिलं आहे. तसंच मराठी माणसाने आपसात भांडू नये” असाही सल्ला प्रबोधनकार ठाकरे यांन दिला. त्यापुढे प्रबोधनकार यांनी उच्चारलेलं वाक्य महत्त्वाचं होतं. “इतके दिवस हा बाळ ठाकरे कुटुंबीयांचा होता. आज बाळ मी तुम्हाला दिला” असं प्रबोधनकार ठाकरे म्हणाले आणि महाराष्ट्राला बाळासाहेब ठाकरे यांच्या रूपाने हिंदूहृदय सम्राट मिळाले.

Leave a Reply