लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मतचोरीच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोग आणि मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी असा आरोप केला की, “निवडणूक आयोगाचा चौकीदार जागा होता, चोरी होताना त्याने पाहिले आणि चोरांना वाचवले.” पहाटे ४ वाजता उठून फक्त ३६ सेकंदात दोन मतदारांची नावे हटवली जात होती आणि नंतर पुन्हा झोप घेतली जात होती, अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर मतदार यादीत फेरफार केल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला.
गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी मतपत्रिकेतील नावे हटवणे, मते डिलीट करणे अशा प्रकारच्या कथित गैरप्रकारांचे पुरावे सादर केले होते. शुक्रवारी त्यांनी पुन्हा एक व्हिडिओ शेअर करत निवडणूक आयोगावर निशाणा साधला. “X” पोस्ट करत त्यांनी लिहिले, “पहाटे ४ वाजता उठायचे, ३६ सेकंदात दोन मतदारांची नावे डिलीट करायची आणि पुन्हा झोपायचे… अशा प्रकारे वोटचोरी झाली. निवडणूक आयोग काँग्रेसच्या मतदारांना लक्ष्य करत आहे आणि त्यांच्या नावांची यादीतून काटछाट करत आहे.”
राहुल गांधींच्या या आरोपांना निवडणूक आयोगाने तीव्र शब्दांत फेटाळले आहे. आयोगाने स्पष्ट केले की, कोणताही नागरिक ऑनलाइन पद्धतीने इतरांचे मत रद्द करू शकत नाही. मतदाराचे नाव वगळण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाते, असेही आयोगाने सांगितले. आयोगाने राहुल गांधींचे आरोप “खोटे आणि निराधार” असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.
