News

TECH-वारी: महाराष्ट्राच्या प्रशासनातील डिजिटल परिवर्तनाची नवी वाटचाल

महाराष्ट्र हे राज्य केवळ शेती, उद्योग आणि शिक्षण यामध्येच नव्हे तर तंत्रज्ञानातही नेहमीच अग्रेसर राहिले आहे. या प्रगत दृष्टीकोनाचीच प्रचीती आता ‘TECH-वारी – महाराष्ट्र टेक लर्निंग वीक’ या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा येत आहे. ५ ते ९ मे २०२५ या कालावधीत मंत्रालय, मुंबई येथे होणाऱ्या या कार्यक्रमात आधुनिक तंत्रज्ञान, वैयक्तिक सक्षमीकरण आणि कार्य-जीवन समतोल या बाबींचा सुरेख संगम अनुभवायला मिळणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या विशेष संकल्पनेतून हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

TECH-वारी: एक अभिनव संकल्पना
सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आयोजित TECH-वारी (Wisdom through wellness and Work-life Balance, Awareness of Emerging technologies, Reform in Governance Practices, Informed and Inclusive Workforce) हा कार्यक्रम केवळ प्रशिक्षण नव्हे, तर शासनाच्या प्रशासनातील बदलाचे प्रतीक आहे. वारी या सांस्कृतिक संकल्पनेवर आधारलेली ही टेक वारी केवळ मंत्रालयापुरती मर्यादित नसून, ती संपूर्ण महाराष्ट्रात तंत्रज्ञानाचा प्रचार-प्रसार करणार आहे.

प्रशासनात तंत्रज्ञानाचा प्रभाव: गतीमान आणि लोकाभिमुख कामकाज
या उपक्रमाचा उद्देश राज्यातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना डिजिटल युगाशी सुसंगत बनवणे हा आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ब्लॉकचेन, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), सायबर सुरक्षा, डिजिटल फायनान्स अशा जटिल वाटणाऱ्या पण अत्यावश्यक तंत्रज्ञानाची माहिती या उपक्रमात सुलभ भाषेत दिली जाणार आहे.

संपूर्ण सशक्तिकरणासाठी – तंत्रज्ञानासोबत मानसिक आरोग्याचाही विचार
केवळ तांत्रिक शिक्षण पुरेसे नाही, तर मानसिक आणि भावनिक आरोग्य यांनाही तितकेच महत्त्व देत TECH-वारीमध्ये तणाव व्यवस्थापन, ध्यानधारणा, कार्य-जीवन समतोल, संगीत थेरपी यावर विशेष सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. यामुळे कर्मचारी अधिक संतुलित, सकारात्मक आणि प्रेरित होतात.

प्रसिद्ध वक्त्यांचा समावेश: प्रेरणादायी व्याख्याने
या कार्यशाळेत अनेक दिग्गज वक्त्यांची उपस्थिती असणार आहे:
• प्रभु गौर गोपालदास – तणावमुक्त जीवनावर मार्गदर्शन (५ मे)
• माधुरा बाचल – पाककृती आणि प्रवासाचा संगम (६ मे)
• रूजता दिवेकर – आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व (७ मे)
• डॉ. संतोष बोराडे – जीवनातील संगीताचे स्थान (८ मे)

प्रशासकीय तंत्रज्ञान परिवर्तनाचे नेते
या कार्यक्रमात भारत सरकारचे आणि महाराष्ट्र सरकारचे अनेक वरिष्ठ अधिकारी आपले विचार मांडणार आहेत. यात:
• श्री. एस. कृष्णन (MeitY) – प्रशासनातील डिजिटल परिवर्तन
• अभिषेक सिंह – एआयचे प्रशासनातील उपयोग
• देबजानी घोष – फ्रंटियर टेकसाठी दिशा
• अमिताभ नाग – भाषाविरोधी अडथळे दूर करणारे तंत्रज्ञान
यांच्यासह महाराष्ट्रातील विविध विभागांचे अधिकारी आपले अनुभव आणि नवकल्पना मांडणार आहेत.

स्टार्टअप्ससाठी सुवर्णसंधी: ‘महाराईज पिचिंग सत्र’
TECH-वारीमध्ये “महाराईज – स्टार्टअप पिचिंग” या सत्राद्वारे महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह २०२५ चे विजेते स्टार्टअप्स प्रशासनासमोर आपली उत्पादने मांडणार आहेत. उत्कृष्ट कल्पनांना १५ लाख रुपयांपर्यंत सहाय्य मिळणार आहे. ही नवसंधी तरुण उद्योजकांसाठी एक मोठा टप्पा ठरणार आहे.

iGOT प्लॅटफॉर्म: शिक्षणाची नवी दिशा
Mission Karmayogi अंतर्गत iGOT या डिजिटल शिक्षण प्लॅटफॉर्मवर महाराष्ट्राने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सुमारे ५ लाख कर्मचाऱ्यांनी नोंदणी करून १० लाखांहून अधिक कोर्सेस पूर्ण केले आहेत. हे प्रशिक्षण प्रमाणपत्र स्वरूपात कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकात जोडले जात आहे.

परिवर्तनाचा पुढाकार: महाराष्ट्राचा निर्धार
TECH-वारी हे केवळ शिक्षण नाही, तर भविष्यातील परिवर्तनाचा एक रोडमॅप आहे. हा उपक्रम सिद्ध करतो की, शासन सुद्धा तंत्रज्ञानाचे नेतृत्त्व करू शकते. प्रत्येक शासकीय कर्मचारी हा परिवर्तनाचा वाहक आहे. या माध्यमातून महाराष्ट्र हे राज्य एक तंत्रसज्ज, लोकाभिमुख आणि संवेदनशील प्रशासन उभारण्याच्या दिशेने ठामपणे वाटचाल करत आहे.

आधुनिक महाराष्ट्राच्या दिशेने सशक्त पाऊल
प्रशासकीय कामकाजात गुणवत्ता, गती आणि लोकाभिमुखता या तीन गोष्टी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्राप्त करता येतात. टेक वारीच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन ‘शिकण्याची संस्कृती’ रुजवून कार्यक्षमतेचा नवा अध्याय लिहीत आहे. ही केवळ एक प्रशिक्षण शृंखला नाही, तर एक प्रेरणादायी चळवळ आहे.

Team Jabari Khabari

Recent Posts

“मूलांना जन्म द्या सबसिडी मिळवा” चीनचे नवे धोरण

चीनची वन चाइल्ड पॉलिसी हे जगातील चर्चेचा विषय ठरलेले धोरण होते. मात्र या धोरणाचे दुष्परिणाम…

3 days ago

Malegaon Blast: 17 वर्षांनंतर अखेर भगवाचं जिकंला! स्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता

मालेगाव येथे 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची विशेष एनआयए न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली…

4 days ago

ट्रम्प यांनी भारतावर लादले कठोर टॅरिफ! रशियासोबत व्यवहाराचा फटका?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 1 ऑगस्टपासून 25% आयात शुल्क लावण्याचा…

4 days ago

Mahadevi Elephant : महादेवीसाठी कोल्हापूरकर रस्त्यावर; गावकऱ्यांचा हत्तीणीला निरोप

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामधील नांदणी गावात स्थित असलेले स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठात…

5 days ago

जय जवान पथक प्रो गोविंदातून बाहेर? नेमकं काय घडलं… वाचा सविस्तर

दहीहंडी दिवशी दहा थरांचा विक्रम रचून केवळ महाराष्ट्रचं नव्हे तर संपूर्ण देशात आपली ओळख निर्माण…

6 days ago

UPI वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी – 1 ऑगस्टपासून व्यवहारामध्ये नवे बदल

वापरकर्त्यांना UPI अॅप्सच्या वापरामध्ये थोडा बदल जाणवेल. कारण युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसमध्ये 1 ऑगस्ट 2025 पासून…

6 days ago