शुभांशू शुक्ला – भारताचा सुपुत्र अंतराळातून सुखरूप पृथ्वीवर

आज भारतासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे! अंतराळातून भारताचा सुपुत्र, ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला, पृथ्वीवर परत येत आहेत. त्यांच्या १८ दिवसांच्या अंतराळ प्रवासाने प्रत्येक भारतीयांची मान गर्वाने उंचावली आहे. शुक्ला यांनी ॲक्सिओम-४ (Ax-4) या खासगी अंतराळ मोहिमेचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) गाठले. ते आयएसएसला भेट देणारे पहिले भारतीय ठरले आहेत आणि राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात प्रवास करणारे दुसरे भारतीय अंतराळवीर आहेत. ही केवळ एक यशस्वी मोहीम नसून भारताच्या मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमासाठी (गगनयान) एक महत्त्वाचा टप्पा आहे.

१८ दिवसांच्या वास्तव्यात, शुक्ला आणि त्यांच्या चमूने ६० हून अधिक वैज्ञानिक प्रयोग केले. यामध्ये सूक्ष्मगुरुत्वाकर्षणात रक्तातील ग्लुकोज तपासणे (मधुमेही व्यक्तींना भविष्यात अंतराळात जाण्यासाठी) आणि अंतराळातील शेतीचे प्रयोग (उदा. मूग आणि मेथीच्या बियांची उगवण, सूक्ष्मशेवाळाचे संशोधन) यांचा समावेश आहे. याशिवाय ISRO साठी देखील ७ वेगवेगळे प्रयोग करून पाहिले, जे भारताच्या अंतराळ मोहिमेसाठी उपयोगी ठरणार आहेत. अंतराळातून शुक्ला यांनी राकेश शर्मा यांच्या “सारे जहाँ से अच्छा” या शब्दांची आठवण करून दिली आणि “आजचा भारत महत्त्वाकांक्षी, निडर, आत्मविश्वासपूर्ण आणि गर्वाने भरलेला दिसतो” असे सांगितले.

१४ जुलै रोजी आयएसएसमधून त्यांचे यान वेगळे झाले आणि १५ जुलै रोजी म्हणजे आज त्यांचे यान पॅसिफिक महासागरात सुरक्षितपणे उतरणार आहे. पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांना गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्यासाठी एक आठवड्याचा पुनर्वसन कार्यक्रम पूर्ण करावा लागेल.

शुभांशू शुक्लांची मोहीम भारताच्या अंतराळ इतिहासातील एक मैलाचा दगड आहे. या मोहिमेने केवळ मानवी अंतराळ संशोधनात भारताची उपस्थिती पुन्हा प्रस्थापित केली नाही, तर गगनयानसारख्या भविष्यातील मोहिमांसाठी मजबूत पाया रचला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *