श्रीमंत रघुजीराजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्रात परत येणार !

छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील शूर मराठा सेनानी, नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक सेनासाहिबसुभा रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार अखेर भारतात परत येणार आहे. लंडन येथे झालेल्या एका आंतरराष्ट्रीय लिलावात महाराष्ट्र सरकारने मध्यस्थीच्या माध्यमातून ही तलवार मिळवण्यात मोठे यश मिळवले असून, सांस्कृतिक वारशाच्या जतनाच्या दिशेने ही एक ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे.

या महत्त्वाच्या घडामोडीची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी मुंबईत दिली. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले की, ऐतिहासिक वारशाच्या पुनर्प्राप्तीसाठी त्यांनी तातडीने पुढाकार घेतला.

लंडनमधील लिलावात ही ऐतिहासिक तलवार विक्रीसाठी निघाल्याचे वृत्त भारतात येताच अ‍ॅड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून तातडीने कारवाई केली. सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांना जबाबदारी देत भारत सरकारच्या दूतावासाशी संपर्क साधला गेला. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या नियोजनातून शासनाने एक विश्वासार्ह मध्यस्थ उभा करून या लिलावात सहभाग घेतला आणि ही तलवार अखेर महाराष्ट्राच्या ताब्यात आली. या प्रक्रियेसाठी वाहतूक, विमा आणि हाताळणीसह सुमारे ₹47.15 लाखांचा खर्च अपेक्षित आहे.

रघुजी भोसले प्रथम (१६९५ – १७५५) हे मराठा साम्राज्याच्या पूर्वेकडील सीमांवर लष्करी नेतृत्व करणारे धाडसी सेनानी होते. बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, चांदा, कुड्डाप्पा, कर्नूल या प्रांतांमध्ये त्यांनी विजय संपादन करून मराठा साम्राज्याचा विस्तार घडवून आणला. शाहू महाराजांकडून ‘सेनासाहिबसुभा’ ही पदवी मिळवणाऱ्या रघुजी भोसले यांचे योगदान हे भारतीय सैन्य इतिहासात अमूल्य मानले जाते.

या तलवारीचे पाते युरोपीय बनावटीचे असून त्यावर सोन्याच्या पाण्याने “श्रीमंत रघोजी भोसले सेनासाहिबसुभा फिरंग” असा देवनागरीत लेख आहे. तलवारीच्या मूठीवर कोफ्तगिरी शैलीचे नक्षीकाम असून तिच्या मुसुमेवर हिरव्या रंगाचे कापड गुंडाळलेले आहे. ही तलवार ‘फिरंग’ पद्धतीतील असून तिचा वापर तत्कालीन मराठा सेनानींकडून सन्मानचिन्ह किंवा प्रतिष्ठेच्या शस्त्र म्हणून केला जात असे.

रघुजी भोसले यांची तलवार इंग्रजांच्या हाती कशी लागली याचा थेट पुरावा नसला तरी इतिहासकारांच्या मते, १८१७ मधील सीताबर्डीच्या लढाईत नागपूरकर भोसले पराभूत झाल्यावर ईस्ट इंडिया कंपनीकडून झालेल्या लुटीत किंवा नजराण्यांमध्ये ही तलवार इंग्लंडमध्ये गेली असण्याची शक्यता आहे. या ऐतिहासिक पुनर्प्राप्तीचा उल्लेख करताना अ‍ॅड. आशिष शेलार यांनी सांगितले की, “ही केवळ एक तलवार परत आणण्याची घटना नाही. ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आणि सांस्कृतिक अस्मितेच्या पुनरुज्जीवनाची सुरुवात आहे.” पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की अशा ऐतिहासिक वस्तू परत आणण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे.

रघुजी भोसले यांची ही तलवार आता महाराष्ट्रात आल्यानंतर ती संग्रहालयामध्ये जनतेसमोर ठेवली जाणार असून, इतिहासप्रेमी, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी ती अभ्यासाचा एक अमूल्य स्रोत ठरणार आहे. ही तलवार मराठा सामर्थ्याचे आणि शौर्याचे स्मारक ठरेल.

या घटनेने सांस्कृतिक धोरण, ऐतिहासिक जतन, आणि राष्ट्रीय अस्मिता यांना एक नवा आयाम दिला आहे. भविष्यात अशा अनेक ऐतिहासिक वस्तू परत आणण्यासाठी शासनाचे प्रयत्न अधिक जोमाने सुरू राहतील, अशी आशा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *