India vs Pakistan Asia Cup 2025 Final Trophy Controversy: भारतीय संघाने आशिया चषक २०२५ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करत स्पर्धेचे आपले नववे विजेतेपद पटकावले. मात्र विजयाच्या दिवशी भारतीय खेळाडूंनी आशिया चषकाची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
Navaratri 2025 :कोकणस्थांची कुलदेवी बीडची अंबेजोगाई कशी झाली? वाचा योगेश्वरीची अद्भुत कथा
सामन्यानंतर जवळपास तासभर पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम उशिरा सुरू झाला. पण भारतीय संघाने आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन तसेच पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. परिणामी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवची विजयानंतरची मुलाखतही घेण्यात आली नाही.
कार्यक्रमादरम्यान सूत्रसंचालक सायमन डुल यांनी भारतीय संघ आज रात्री आपली पारितोषिकं स्वीकारणार नसल्यामुळे हा पारितोषिक समारंभ इथेच संपतो, असे जाहीर केले. फक्त अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि कुलदीप यादव यांनी आपापली वैयक्तिक पारितोषिकं स्वीकारली, परंतु संपूर्ण संघाने ट्रॉफी उचलण्यासाठी किंवा सामूहिक छायाचित्रासाठी मंचावर जाण्यास नकार दिला.
यावेळी आणखी एक विचित्र प्रसंग घडला. सामना संपून जवळपास एक तास उलटूनही पाकिस्तानी खेळाडू ड्रेसिंग रूममधून बाहेर आले नव्हते. प्रोटोकॉलनुसार मोहसिन नक्वी यांना पारितोषिक वितरण करायचे होते, पण ते एकटेच व्यासपीठावर उभे होते. जवळपास ५५ मिनिटांनी अखेर सलमान आघा आणि त्याचे सहकारी मैदानावर आले. पण त्यांचे स्वागत “इंडियाआ… इंडियाआ…” अशा जोरदार घोषणांनी झाले.
भारताचा विजय निश्चित होताच चर्चेला उधाण आले होते की, भारतीय खेळाडू ट्रॉफी स्वीकारण्यास नकार देऊ शकतात. कारण नक्वी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि मंत्री असून भारतविरोधी भूमिकेसाठी ते ओळखले जातात.
गेल्या काही दिवसांत नक्वी यांनी ‘एक्स’वर दोन व्हिडिओ शेअर केले होते. त्यामध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या गोल सेलिब्रेशनसोबत विमान अपघाताचे दृश्य दाखवले गेले होते. अगदी असाच इशारा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफने भारताविरुद्ध २१ सप्टेंबरला झालेल्या सुपर-४ सामन्यात दिला होता. त्याबद्दल त्याच्यावर दंडही ठोठावण्यात आला होता.
