नरकचतुर्दशी – अभ्यंगस्नानाची पौराणिक कथा

Lifestyle News

दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे एक वेगळे महत्व आहे. धनत्रयोदशीनंतर येते नरकचतुर्दशी. हिंदू धर्मातील पौराणिक कथांनुसार, या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून निरपराध स्त्रियांची सुटका केली त्यानंतर हा दिवस “नरकासुराचा वध” झाला याचा आंनद साजरा करण्यासाठी केला जाऊ लागला. आजही लोक पहाटे स्नान करून, दिवे लावतात आणि अंध:काराचा नाश होऊन नव्या आशेचा प्रकाश फुलावा अशी प्रार्थना करतात.

भागवत पुराणानुसार, नरकासुर नावाचा बलाढ्य असुर प्राग्ज्योतिषपुर (आत्ताचे गुवाहाटी) राज्याचा अधिपती होता. तो अत्यंत पराक्रमी, पण निर्दयी आणि दुष्ट स्वभावाचा होता. नरकासुराने इंद्राचे राज्य हडपले होते, तसेच देव अदितींची कुंडले चोरली होती. अमरपर्वतावरील मणिपर्व हे स्थान देखील बळकावले होते. देवांसहित मानव देखील त्याच्या अत्याचारांनी हैराण झाले होते. मणिपर्वतावर त्याने एक मोठा महल बांधला होता. या महलात त्याने चोरून आणलेल्या 16 हजार एकशे उपवर महिलांना कोंडून ठेवण्यात आले होते. महालामध्ये प्रत्येक स्त्री साठी रत्नजडित मंदिर देखील बांधले होते. या मंदिरात त्या स्त्रियांशी लग्न करण्याचा त्याचा बेत होता.

ही माहिती जेव्हा श्रीकृष्णाला कळली, तेव्हा त्याने मणिपर्वतावर जाऊन नरकासुराशी युद्ध केले. या युद्धात श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला, व 16 हजार एकशे स्त्रियांची सुटका केली. यानंतर त्या महिलांनी नरकासुराने आमचे अपहरण केले त्यामुळे आता आमचा कुणी स्वीकार करणार नाही, त्यामुळे महिलांनी श्रीकृष्णाकडे त्यांना वरण्याची विनंती केली. तेव्हा श्रीकृष्णाने त्यांच्याशी विवाह करण्याचे वचन दिले. या घटनेनंतरच श्रीकृष्णाच्या 16 हजार 108 पत्नी होत्या अशी आख्यायिका सांगितली जाते. तसेच नरकासुराने देवतांकडून चोरलेली रत्ने व मौल्यवान वस्तू श्रीकृष्णाने ज्यांच्या त्यांना परत केल्या.

हे रात्रप्रहरी झाले उष:काळी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून, त्याच्या रक्ताचा टीळा कपाळी लावला. पुन्हा मथुरेत परतल्यानंतर नंदाने त्याला मंगल स्नान घातले. स्त्रियांनी जागोजागी दिवे लावले. काहींनी गोड पदार्थ करून आनंद व्यक्त केला. या घटनेनंतर सगळीकडे आनंदोस्तव साजरा करण्यात आला. याच घटनेच्या स्मरणार्थ आजही नरकचतुर्दशी साजरी करण्यात येते.

या दिवशी अभ्यंगस्नान म्हणजे सूर्य उगवण्याआधी उटणं लावून अंघोळ करण्यात येते. ज्यामुळे शरीराला तेज येते आणि आरोग्यही चांगले राहते. नरकासूर वधाच्या स्मरणार्थ कारीट नावाचे हिरवे फळ पायाच्या अंगठ्याने फोडले जाते. कारीट म्हणजे अंहकार आणि वाईट प्रवृत्तींचा नाश. असे मानले जाते की या स्नानाने शरीरशुद्धी आणि मनशुद्धी होते.
संध्याकाळी अंगणात किंवा घराबाहेर रांगोळी काढून दिव्यांची आरास केली जाते.

Leave a Reply