भारतीय बुद्धिबळ क्षेत्रासाठी 2025 हे वर्ष एक ऐतिहासिक पर्व ठरत आहे. या इतिहासाच्या केंद्रस्थानी आहे 19 वर्षांची दिव्या देशमुख. एक तरुण, आत्मविश्वासू आणि असामान्य बुद्धिमत्तेची खेळाडू. FIDE Women’s World Cup 2025 मध्ये तिच्या जबरदस्त कामगिरीने केवळ बुद्धिबळ प्रेमींचचं नव्हे, तर संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिने उपांत्य फेरीत चीनच्या माजी विश्वविजेत्या ग्रँडमास्टर टॅन झोंगयी हिला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला आणि त्याचबरोबर इतिहासात आपलं नाव कोरलं.
वयाच्या 19 व्या वर्षी अभूतपूर्व यश
दिव्याचं वय अवघं 19 वर्षं. पण तिच्या खेळातली परिपक्वता, डावपेचातील स्पष्टता आणि मानसिक ताकद प्रगल्भ खेळाडूंच्याही पातळीवरची आहे. FIDE Women’s World Cup च्या उपांत्य फेरीत, तिच्यापेक्षा अधिक अनुभवी आणि नामांकित असलेल्या टॅन झोंगयीविरुद्ध तिने जे काही साध्य केलं, ते केवळ एका सामन्याचं यश नव्हतं ते भारतीय महिला बुद्धिबळाच्या उत्क्रांतीचं प्रतीक होतं. दिव्याने फक्त सामना जिंकला नाही, तर तिने तिचा पहिला ग्रँडमास्टर नॉर्म (GM Norm) सुद्धा प्राप्त केला – जो कोणत्याही बुद्धिबळपटूच्या करिअरमधील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. ग्रँडमास्टर पदासाठी तीन नॉर्म आवश्यक असतात आणि दिव्याने या विजयामुळे पहिलं पाऊल भक्कमपणे पुढे टाकलं आहे.
सामन्याची उत्कंठावर्धक रंगत
उपांत्य फेरीतील पहिला गेम काळ्या मोहरांनी खेळताना दिव्याने बरोबरीत राखला. या गेममध्ये संयम आणि बचावात्मक खेळी तिच्या परिपक्वतेचं उदाहरण ठरली. दुसऱ्या सामन्यात तिला पांढऱ्या मोहरे मिळाले, आणि इथेच तिची कल्पकता आणि डावपेचातील चातुर्य चमकून आलं. सुरूवातीपासूनच तिने बोर्डवर नियंत्रण घेतलं, आणि बारीकसारीक चुका शोधून टॅन झोंगयीला अडचणीत आणलं. मिडल गेममध्ये प्रेशर टाकत तिनं तिच्या विरोधकाला चुकवायला लावलं आणि संधीचा फायदा घेत शेवटपर्यंत खेळावर पकड राखत विजय मिळवला.
भारतातील महिला बुद्धिबळाची नवी क्रांती
दिव्या देशमुखचं हे यश केवळ तिच्या वैयक्तिक कारकिर्दीतला मैलाचा दगड नाही, तर भारतीय महिला बुद्धिबळाचं एक ऐतिहासिक वळण आहे. आजवर बुद्धिबळ क्षेत्रात भारतात पुरुष खेळाडूंना जास्त प्रसिद्धी मिळाली, पण गेल्या काही वर्षांपासून महिला खेळाडूही आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकू लागल्या आहेत. कोनेरू हम्पी, हरिका द्रोणावल्ली यांसारख्या दिग्गज खेळाडूंनी या वाटेची पायाभरणी केली, आणि आता त्यावरून दिव्यासारख्या नव्या पिढीच्या खेळाडूंचं दमदार आगमन होत आहे.
दिव्याचं अंतिम फेरीत पोहोचणं म्हणजे संपूर्ण भारतीय महिला बुद्धिबळासाठी प्रेरणादायी टप्पा आहे. तिच्या विजयामागे फक्त खेळातील तयारी नाही, तर मानसिक ताकद, चिकाटी, आणि स्वप्न पूर्ण करण्याची जिद्दही आहे.
छोट्या शहरातून जागतिक व्यासपीठावर
दिव्या देशमुख नागपूरची रहिवासी आहे. अशा शहरातून येऊन ती आंतरराष्ट्रीय स्तरावर इतकी प्रगती करतेय, हे भारतीय क्रीडा व्यवस्थेतील बदलती मानसिकता दर्शवतं. मोठ्या शहरांपुरतीच मर्यादित संधी आता लहान शहरांमध्येही पोहोचू लागल्या आहेत आणि त्याचा उत्तम उपयोग दिव्यासारख्या खेळाडूंनी करून दाखवलाय. ती सातत्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेत, नावाजलेल्या खेळाडूंना हरवत पुढे जात आहे. तिची कामगिरी स्पष्ट दाखवते की, प्रतिभेला मर्यादा नसते, आणि संधी मिळाल्यास भारताची मुली कोणत्याही मंचावर आपलं वर्चस्व गाजवू शकतात.
आज लाखो तरुण-तरुणी स्पर्धा परीक्षांमध्ये, शालेय शिक्षणात किंवा खेळात आपलं स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशा काळात दिव्यासारखी खेळाडू प्रेरणादायी उदाहरण ठरते. तिच्या जीवनातून हे शिकता येतं की, शिस्तबद्ध सराव, मानसिक स्थैर्य, आणि अपार मेहनत हे कोणत्याही यशामागचं खरं गुपित आहे.
चीनची वन चाइल्ड पॉलिसी हे जगातील चर्चेचा विषय ठरलेले धोरण होते. मात्र या धोरणाचे दुष्परिणाम…
मालेगाव येथे 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची विशेष एनआयए न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 1 ऑगस्टपासून 25% आयात शुल्क लावण्याचा…
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामधील नांदणी गावात स्थित असलेले स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठात…
दहीहंडी दिवशी दहा थरांचा विक्रम रचून केवळ महाराष्ट्रचं नव्हे तर संपूर्ण देशात आपली ओळख निर्माण…
वापरकर्त्यांना UPI अॅप्सच्या वापरामध्ये थोडा बदल जाणवेल. कारण युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसमध्ये 1 ऑगस्ट 2025 पासून…