दरवर्षी हजारो भारतीय तरुण-तरुणी डॉक्टर, इंजिनिअर, आयटी तज्ज्ञ, हॉटेल मॅनेजमेंट, नर्सिंग इत्यादी क्षेत्रांमध्ये परदेशात करिअर करण्याच्या आशेने स्थलांतर करतात. चांगल्या पगाराचे आमिष, जीवनशैलीतील सुधारणा आणि जागतिक अनुभव याच्या शोधात हे युवक विदेशी नोकऱ्यांच्या जाहिरातींना प्रतिसाद देतात. मात्र या आशेचं आता भयावह वास्तव उघड होत आहे – सायबर गुलामगिरीच्या स्वरूपात!
“सायबर गुलामगिरी” म्हणजे काय?
सायबर गुलामगिरी हा आधुनिक काळातील मानव तस्करीचा अत्यंत घृणास्पद आणि धोकादायक प्रकार आहे. यात पीडितांना सायबर फसवणूक करण्यासाठी बळजबरीने काम करायला लावले जाते. आशियाई देशांतील टोळ्या भारतातील बेरोजगार तरुणांना फसवून त्यांना म्यानमार, लाओस, कंबोडिया, थायलंडमध्ये पाठवतात. सुरुवातीला चांगल्या नोकरीचे आमिष, वर्क व्हिसा आणि भरघोस पगार असे गोडगोड बोल देऊन टुरिस्ट व्हिसावर त्यांना या देशांत पाठवले जाते.
सत्य काय आहे? – सतीश आणि हरीश यांची सत्यक था
वसई-विरारमधील सतीश, जो एके काळी मुंबईत हॉटेल मॅनेजर म्हणून काम करत होता, तो एका बनावट नोकरीच्या प्रस्तावाला बळी पडला. थायलंडमध्ये नोकरी मिळवणार असल्याच्या विश्वासाने तो गेला, पण तिथून त्याला थेट म्यानमारच्या निर्जन जंगलात एका कंपाउंडमध्ये नेण्यात आले.
“माझा पाच हजार डॉलर्समध्ये सौदा झाला होता,” असं तो सांगतो. बंदुकीधारी बंडखोरांच्या पहाऱ्याखाली त्याच्याकडून सायबर गुन्हे करुन घेतले गेले.
हरीश (बदलेले नाव), आणखी एक पीडित, फेसबुक व इन्स्टाग्रामवरून जॉब ऑफरच्या जाळ्यात अडकला. थायलंडला पोहोचल्यावर त्याचा पासपोर्ट आणि मोबाईल काढून घेण्यात आला, आणि त्याला म्यानमारमध्ये एका बंदिस्त ठिकाणी नेण्यात आले. तिथे त्याच्याकडून सायबर फसवणूक, शेअर्स ट्रेडिंग, फेक गुंतवणूक स्कीम्स यासाठी जबरदस्तीने काम करून घेतले गेले.
महाराष्ट्र सायबर पोलिसांची मोठी कारवाई
या प्रकरणाची माहिती काही पीडितांनी आपल्या कुटुंबियांना पाठवलेल्या गुप्त संदेशांमुळे मिळाली. महाराष्ट्र सायबर पोलिस आणि भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने संयुक्त ऑपरेशन राबवत म्यानमारमधून एकूण 60 भारतीय नागरिकांची सुटका केली. ही भारतातील या प्रकारातील सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपी:
• मनीष ग्रे ऊर्फ मॅडी – वेब सिरीजमध्ये अभिनेता
• तैसन ऊर्फ आदित्य रवी चंद्रन
• रूपनारायण गुप्ता
• जेन्सी राणी डी
• तलानिती नुलाक्सी – चिनी-कझाक नागरिक
टोळ्यांचे कार्यपद्धती कशी असते?
• सोशल मीडिया जाहिरातींच्या माध्यमातून टार्गेटिंग
• अगदी व्यावसायिक वाटणारे संवाद – व्हॉट्सॲप, ईमेल, कॉल्स
• नकली ऑफर लेटर, विमान तिकीट, व्हिसा सादर करणे
• टुरिस्ट व्हिसावर देशात प्रवेश देऊन, मोबाईल-पासपोर्ट हिसकावून घेणे
• निर्जन ठिकाणी कोंडून सायबर गुन्हे करण्यासाठी छळ
कोणत्या कामासाठी जबरदस्ती?
• बनावट सोशल मीडिया प्रोफाइल तयार करणे
• लोकांना फसवून चुकीच्या लिंकवर क्लिक करायला लावणे
• क्रिप्टोकरन्सी अॅप्समध्ये गुंतवणूक करायला भाग पाडणे
• टेलिकॉलिंग, OTP हेरगिरी, फसवणूक स्कीम्स प्रचार
जर विरोध केला तर शारीरिक मारहाण, अवयव विक्रीची धमकी आणि टोळ्यांमध्ये विक्री करण्याचे प्रकार घडतात.
सामान्य नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी
सायबर तज्ञ प्रशांत माळी यांच्या मते, पुढील गोष्टी लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे:
• “खूप कमी पात्रता आणि जास्त पगार” यासारख्या ऑफर्सकडे शंका घेऊन पाहा
• कोणतीही कंपनी MEA (परराष्ट्र मंत्रालय) कडून प्रमाणित आहे का, ते तपासा
• अधिकृत ई-मायग्रेट पोर्टल (eMigrate.gov.in) वापरा
• सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या ऑफर्सना उत्तर देताना काळजी घ्या
• कोणतीही नोकरी स्वीकारण्यापूर्वी दूतावास/परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क ठेवा
जनजागृती हाच सर्वोत्तम उपाय
सायबर गुलामगिरी ही केवळ वैयक्तिक फसवणूक नाही, तर ती राष्ट्रीय सुरक्षेचाही प्रश्न आहे. हे रॅकेट थांबवण्यासाठी:
• गावपातळीवर सायबर जागरूकता अभियान राबवणे आवश्यक आहे
• शाळा-महाविद्यालयात विशेष सत्र घ्यावीत
• सायबर पोलिसांनी वेळोवेळी माहिती जाहीर करावी
• नागरिकांनी सायबर क्राईमबद्दल जागरूक राहून पोलिसांकडे त्वरित तक्रार नोंदवावी