टी–२०, वन डे किंवा टेस्ट… मॅच कोणतीही असो, सिच्युएशन टाइट झाली, की कॅप्टनसह प्रत्येक फॅनचं लक्ष एकाच खेळाडूकडे जातं आणि तो म्हणजे जसप्रीत बुमराह! तो मॅच खेळतोय म्हटलं, की प्रत्येक भारतीय चाहत्याच्या मनात “काहीही झालं तरी जस्सी आपल्याला मॅच जिंकवणार” अशी भावना असते. स्पीड आणि अप्रतिम यॉर्करमुळे जगभरातील बॅट्समनना धडकी भरवणाऱ्या या गोलंदाजाने आज प्रत्येक भारतीयाच्या मनात खास स्थान मिळवलं आहे. पण या यशामागे एक कटू सत्य दडलं आहे. ते म्हणजे त्याच्यावर असलेला वर्कलोड आणि त्यामुळे वारंवार होणाऱ्या दुखापती.
प्रत्येक ICC स्पर्धेच्या वेळी पहिला प्रश्न असतो “बुमराह फिट आहे की नाही?” कारण लोकांच्या दृष्टीने तो फक्त बॉलर नाही, तर “मॅच वाचवणारा योद्धा” आहे. पण कधी कधी आपण हे विसरतो, की तो देखील माणूस आहे. आयपीएल, टेस्ट, वन डे, टी–२०… सतत प्रवास, फिटनेस ट्रेनिंग आणि सलग मॅचेस,शरीर कितीही ताकदवान असलं, तरी कधी ना कधी थकतच आणि त्यातूनच होतात इंज्युरी!
दुखापतीतून परतताना त्याला प्रत्येक वेळी पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागते. जसं एखादा विद्यार्थी पुन्हा वही उघडून अक्षर गिरवतो. त्याचं यश दिसतं, पण त्यामागे दडलेली मेहनत, जिद्द आपल्याला कधीच दिसत नाही. तो जेव्हा मैदानावर चार ओवर्स टाकतो, तेव्हा त्याच्या मागे त्याला हजारो ‘बॉल्स’ची प्रॅक्टिस करावी लागते, हे आपण कधीच लक्षात घेत नाही.
म्हणून पुढच्या वेळी तो दुखापतीमुळे खेळत नसेल, तेव्हा निराश होण्याऐवजी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा “तो विश्रांती घेत आहे, कारण तो पुन्हा भारतासाठी सर्वोत्तम देण्यासाठी तयार होत आहे.”
