Piyush Pandey Passes Away: भारतातील जाहिरात विश्वातील एक प्रभावशाली आणि सर्जनशील व्यक्तिमत्व असलेल्या पीयूष पांडे यांचे गुरुवारी निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. भारतातील जाहिरातींना एक वेगळेपण प्रदान करण्यात पांडे यांचे महत्त्वाचे योगदान होते. ओगिल्वी इंडियामध्ये त्यांनी ४० वर्षांहून अधिक काळ काम केले. पांडे यांनी अनेक गाजलेल्या आणि वर्षांनुवर्षे लोकांच्या स्मरणात राहतील, अशा जाहिराती पांडे यांनी दिल्या. २०१४ साली ‘अब की बार, मोदी सरकार’ हे घोषवाक्य आणि मिले सूर मेरा तुम्हारा हे गाणे लिहिणारे पांडे यांच्या निधनामुळे राजकारणापासून ते जाहिरात क्षेत्र, सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे.
तरूणपणी सुरुवातीला क्रिकेटपटू, टी टेस्टर आणि बांधकाम मजूर म्हणून काही काळ काम केल्यानंतर पांडे यांनी १९८२ साली ओगिल्वी कंपनीत प्रवेश केला. २७ व्या वर्षी जाहिरात क्षेत्रात पदार्पण करत इंग्रजीचा दबदबा असलेल्या या क्षेत्रात पांडे यांनी आपल्या लेखणीने स्वतःचे वर्चस्व निर्माण केले. त्यांनी जाहिरातींना दिलेले शब्द भारतीय लोकांना कायमचे लक्षात राहिले.
एशियन पेंट्ससाठी ‘हर खुशी मे रंग लाए’, कॅडबरीसाठी ‘कुछ खास है’, ठंडा मतलब कोका-कोला, फेविकॉल आणि हचसाठी पग श्वानाचे कॅम्पेन अशा कितीतरी उत्पादनांना कायम लक्षात राहतील, अशा जाहिराती पांडे यांनी दिल्या.
कोण होते पीयूष पांडे?
पांडे यांचा जन्म १९५५ साली जयपूरमध्ये झाला होता. पियुष पांडे यांचे बंधू प्रसून पांडे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. तर बहीण इला अरुण गायिका आणि अभिनेत्री आहे. पांडे यांचे वडील एका बँकेत नोकरी करत होते. पीयूष अनेक वर्ष क्रिकेटही खेळत होते.
