कधी काळी स्वतःला भारतीय संघात स्थान न मिळालेल्या खेळाडूने, आज भारताला विश्वविजेता बनवलं आहे. ही गोष्ट आहे अमोल मुजुमदार नावाच्या शांत वादळाची…
२ नोव्हेंबरची रात्र. महिला विश्वचषककडे सर्वांची नजर लागलेली असताना, एक व्यक्ती जी मैदानाच्या बाजूला उभी राहून हाताची घडी घालून ठाम विश्वासाने स्टेडियमकडे बघत होती, ती म्हणजे, अमोल मुजुमदार. ज्यांनी कधी स्वतः ब्ल्यू जर्सी घातली नाही, पण ज्यांनी त्या जर्सीचं स्वप्न असंख्य खेळाडूंच्या डोळ्यांत जिवंत ठेवलं.
अमोलजी हे मूळचे मुंबईचे. रामाकांत आचरेकर यांच्या कठोर प्रशिक्षणाखाली अमोल घडलेले. मुजुमदारांनी मुंबईच्या रणजी क्रिकेटमध्ये धावांचा महासागर उभारलेला. तब्बल ११,१६७ धावा त्यांनी रणजीमध्ये काढल्या! पण तरीही “इंडिया”ची ब्ल्यू जर्सी त्यांना कधीच मिळाली नाही. अमोल हसून म्हणायचे- “क्रिकेटने मला सगळं दिलं, फक्त कॅप नाही.” पण यावर ते खचून नाही गेले. २००४ पासून त्यांनी प्रशिक्षक म्हणून काम सुरु केलं.
कोचिंगमध्ये पाऊल टाकलेल्या अमोलनं मुंबई, आंध्र आणि IPL मधल्या राजस्थान रॉयल्ससोबत काम केलं. त्याच्या बोलण्यात गाजावाजा नव्हता, पण विचारात तीक्ष्णता होती. खेळाडूंमध्ये विश्वास, टीम भावना, सांघिक वृत्ती ते निर्माण करत.
२०२३ मध्ये बीसीसीआयनं त्याला भारतीय महिला क्रिकेट संघाचं सूत्र दिलं. काहींना शंका होती, जे भारतासाठी खेळले नाही, ते भारताला काय शिकवणार? आणि महिला वर्ल्डकप अशी काय कामगिरी गाजवणार? पण त्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाने कायमच जबरदस्त कामगिरी दाखवली.
२०२५ चा वर्ल्ड कप सुरू झाला, आणि भारताचा प्रवास सुरुवातीला डळमळीत होता. फलंदाज अपयशी, गोलंदाज गोंधळलेले, मनोबल हरवलं. पण अमोलनी शेवट गोड आणि ऐतिहासिक करायचा ठरवलेला.
स्मृतीची बॅट, हरमनप्रीतचा आत्मविश्वास, शफाली आणि दीप्तीने सामना पलटवला. आणि अखेरीस भारत विश्वविजेता झाला! २० वर्षांचा अनुभव, मेहनत, ज्ञान, संयम या सर्वाचा मेळ म्हणजे अमोल मुजुमदार यांनी केलेला खेळ आहे. इंडियाची कॅप मिळाली नाही म्हणून त्यांनी प्रवास सोडला नाही, आजच्या ऐतिहासिक विजयाचे ते शिलेदार ठरले.
