Rahul Gandhi Lord Ram Controversy : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गेल्या महिन्यात राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन भाजपासह केंद्रीय निवडणूक आयोगाला लक्ष्य केले. गेल्या वर्षीच्या लोकसभा आणि त्यापाठोपाठ झालेल्या काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. इतकेच नाही, तर राहुल यांनी पत्रकार परिषदेत काही पुरावेदेखील सादर केले. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळाल्या. हे प्रकरण ताजे असतानाच आता उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरातील काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आलेल्या एका बॅनरमुळे राजकीय वाद निर्माण झाला. भाजपानं या बॅनरवर आक्षेप घेतला असून, काँग्रेसवर तीव्र टीका केली आहे.
Divorce case in India:भारतातील पहिला घटस्फोट, ज्याने निर्माण केला महिला हक्क कायदा! वाचा सविस्तर
काँग्रेसच्या बॅनरवर नेमकं काय आहे?
गुरुवारी (२ ऑक्टोबर) संपूर्ण देशभरात विजयादशमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने राजकीय पक्षांनी ठिकठिकाणी बॅनरबाजी केल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेसच्या लखनऊ येथील कार्यालयाबाहेर विजयादशमीनिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवर रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांना धनुष्यबाण धारण केलेल्या प्रभू श्रीरामाच्या रूपात, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांना लक्ष्मणाच्या रूपात दाखवण्यात आले. यावेळी दोघेही रावणाचा वध करताना दिसून आले. विशेष बाब म्हणजे बॅनरवरील रावणाच्या एका डोक्यावर ‘मतचोर’ असा उल्लेख करण्यात आलेला होता आणि इतर डोक्यांवर ईडी, भ्रष्टाचार, महागाई व निवडणूक आयोग अशी नावे लिहिलेली होती.
मोदींनी २०१४ मध्येच काँग्रेसरूपी रावणाचा वध केला
या प्रकरणावर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली. “काँग्रेसने आपल्या कार्यालयाबाहेर बॅनर लावून अत्यंत बेजबाबदार कृत्य केले आहे. राहुल गांधी यांची तुलना तुम्ही भगवान रामाशी कोणत्या आधारावर करीत आहात? हा हिंदू धर्माचा अपमान असून, काँग्रेसच्या नेत्यांनी ताबडतोब देशाची माफी मागायला हवी”, असे पाठक यांनी म्हटले आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये काँग्रेसरूपी रावणाची १० मस्तके छाटून देशाची सूत्रे आपल्या हातात घेतली होती. त्यामध्ये ७० वर्षांची लूट व भ्रष्टाचार, परिवारवादाची मुळे, कोळसा व टूजी घोटाळा, आणीबाणीतील काळा अध्याय, शीखविरोधी हिंसाचार, अर्थव्यवस्थेची झालेली दुर्दशा आणि देशाच्या सुरक्षेशी केलेला खेळ यांसारख्या गोष्टींचा समावेश होता”, अशी टीकाही ब्रजेश पाठक यांनी केली.
