Asia Cup 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करून दणदणीत विजय मिळवला. मात्र सामन्यानंतर मैदानावर जे घडलं ते क्रिकेटविश्वाला हादरवून टाकणारं होतं.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा प्रमुख आणि आशियाई क्रिकेट परिषदेचा अध्यक्ष असलेला मोहसिन नक्वी याच्याकडून भारताने ट्रॉफी आणि पदकं स्वीकारण्यास नकार दिला. काही वेळ वाट पाहिल्यानंतर ट्रॉफी परत करण्याऐवजी नक्वी ट्रॉफी आणि पदकं उचलून मैदानातून थेट आपल्यासोबत घेऊन गेला.
या घटनेनंतर मोठा वाद निर्माण झाला. या संपूर्ण प्रकारावर बीसीसीआयने तीव्र नाराजी व्यक्त केली. BCCI ने मोहसिन नक्वीला ACC अध्यक्षपदावरून हटवण्याकरीता प्रयत्न देखील सुरू केले आहेत. बीसीसीआयकडून आशिष शेलार आणि राजीव शुक्ला देखील सहभागी झाले आहेत.
ट्रॉफी आणि पदकं कुठे आहेत याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र ट्रॉफी आणि पदके ACC च्या दुबई ऑफिसमध्येच सुरक्षित असल्याचे समजले. त्यामुळे आता लवकरच भारताकडे ट्रॉफी आणि पदके परत येणार असल्याचे सांगितले जात आहे.
नक्वी पाकिस्तानमधील शाहबाज शरीफ सरकारमध्ये गृहमंत्री असून त्याचबरोबर पीसीबीचा अध्यक्ष आणि एसीसी प्रमुख आहे. या दुहेरी भूमिकेमुळे हितसंबंधाचा संघर्ष निर्माण झाला असून क्रिकेटमध्ये राजकारण घुसवल्याचा आरोप त्याच्यावर केला आहे. बीसीसीआयने कठोर भूमिका घेत, नक्वीने निष्पक्षतेच्या आचारसंहितेचा भंग केला आहे, यामुळे आशिया कपच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
