Navaratri 2025

Navaratri2025: नवरात्रीत महाअष्टमीला का असते सर्वाधिक महत्त्व?

News Trending

Importance of MahaAshtami in Navaratri: सध्या सर्वत्र नवरात्रोत्सवाची धूमधाम पाहायला मिळते. भारतात हा उत्सव वर्षातून दोन वेळा साजरा केला जातो. एक वसंत नवरात्र आणि दुसरी म्हणजे शारदीय नवरात्र. या नऊ दिवसांच्या उत्सवात प्रत्येक दिवशी आई दुर्गेच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. कुमारी, पार्वती आणि काली या रूपांची पूजा विशेष महत्त्वाची मानली जाते. परंतु नवरात्रातील सर्वात खास दिवस म्हणजे अष्टमी.

Navaratri 2025:मुंबादेवीवरून मुंबई! पण मुंबा हे नाव देवीला कसे मिळाले?
Navaratri 2025 : पाकिस्तानातील मुस्लिम करत असलेली नानी का हज आहे आपल्या हिंदूंचे शक्तिपीठ !

अष्टमीचे महत्त्व सांगणारी अनेक पौराणिक कथाही प्रचलित आहेत. आई दुर्गेची नऊ रुपे आहेत – शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धीदात्री. नवरात्रात या प्रत्येक रूपांची आराधना केली जाते. दंतकथेनुसार प्राचीन काळी दुर्गम नावाचा एक बलाढ्य राक्षस होता. त्याने तीनही लोकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण केली होती. देवताही त्याच्या अत्याचाराने घाबरून गेल्या होत्या. तेव्हा भगवान शंकरांनी शुक्ल पक्षातील अष्टमीला देवी दुर्गेची निर्मिती केली आणि तिला सर्वात शक्तिशाली शस्त्र दिले. त्यानंतर देवीने अष्टमीला दुर्गमाचा वध केला आणि याच घटनेनंतर दुर्गाष्टमीची सुरुवात झाली.

याच दिवशी देवीने महिषासुर राक्षसाचाही वध करून विजय मिळवला. या वेळी देवीने रौद्र रूप धारण केले होते. म्हणूनच या दिवशी देवीला भद्रकालीच्या रूपानेही पूजले जाते. अष्टमी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय, धैर्य आणि शक्तीचे प्रतीक. या दिवशी देवीच्या शस्त्रांची पूजा केली जाते. त्यामुळे हा दिवस विराटाष्टमी म्हणूनही ओळखला जातो.

धार्मिक परंपरेनुसार अष्टमीला अनेक घरांमध्ये श्रीमहालक्ष्मी पूजन केले जाते. तांदळाच्या पिठाचा महालक्ष्मीचा मुखवटा तयार करून रात्रभर जागरण केले जाते. कोकणात नवविवाहित मुलगी लग्नानंतर पाच वर्षे महालक्ष्मी पूजन करण्याची परंपरा आहे. महाष्टमीच्या दिवशी अनेक भक्त कडक उपवास करतात, नवार्ण यंत्र आणि दुर्गेची विशेष पूजा करतात. या दिवशी सप्तशतीचा पाठ, होम आणि दीपपूजा करण्याचाही प्रघात आहे. अष्टमी संपण्यापूर्वीची चोवीस मिनिटे आणि नवमी सुरू होण्याच्या चोवीस मिनिटांचा कालावधी संधीकाळ म्हणून ओळखला जातो आणि या वेळी भगवती देवीची पूजा विशेषतः केली जाते.

अष्टमीच्या दिवशी सकाळी स्नान करून भक्त देवीच्या शस्त्रांची पूजा करतात. लाल फुले, लाल चंदन, धूप, दिवे आणि नैवेद्य अर्पण केले जाते. देवीला गुलाबी फुले, केळी, नारळ, सुपारीची पाने, लवंग, वेलची, सुका मेवा आणि पंचामृत अर्पण केले जाते. पंचामृत हे दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे मिश्रण करून तयार केले जाते. या दिवशी शाश्वत ज्योत प्रज्वलित करून “सर्व मंगल-मांगल्ये, शिवे सर्वथा साधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते” हा मंत्र जपला जातो. त्यानंतर दुर्गाचालीसाचे पठण करून आरती केली जाते.

दुर्गा अष्टमीचा उपवास स्त्रिया आणि पुरुष दोघेही करतात. काही भक्त अन्नपाण्याशिवाय उपवास पाळतात, तर काही दूध, फळे किंवा हलका आहार घेऊन उपवास पूर्ण करतात. उपवास करण्यामागील उद्देश भक्तीभावाने देवीची आराधना करणे आणि आत्मसंयम पाळणे हा आहे.

दुर्गा अष्टमी हा दिवस म्हणजे देवीच्या शक्तीची उपासना, वाईटावर चांगल्याचा विजय आणि संपूर्ण विश्वाला भयमुक्त करणाऱ्या दुर्गामातेची आठवण करून देणारा उत्सव आहे.

Leave a Reply