पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताविरोधात गरळ ओकत अनेक दावे केले. त्यापैकी एक म्हणजे हिंदुस्थानची सात लढाऊ विमाने पाडत पाकिस्तानने विजय मिळवल्याचे शरीफ यांनी सांगितले. मात्र त्यांच्या या हास्यास्पद दाव्याला प्रत्युत्तर देत भारताने सर्व आरोप धुळीस मिळवले आहेत.
भारताच्या राजनैतिक अधिकारी पेटल गहलोत यांनी उत्तराचा अधिकार वापरत UN च्या मंचावरून पाकिस्तानला जबदरस्त फटकारले. त्या म्हणाल्या “ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैन्याने उद्धवस्त केलेली तुमची हवाई तळाची धावपट्टी तुम्हाला विजयासारखी दिसते का? असा खोचक सवाल गहलोत यांनी शाहबाज शरिफ यांनी केला. पुढे, भारतीय सैन्याने पाकिस्तानी एअर बेसवर केलेल्या विध्वंसाचे फोटो जगासमोर आहेत. जर उद्ध्वस्त धावपट्टी आणि जळलेले हँगर हे शरिफ यांच्या मते विजयाचे चिन्ह असतील, तर पाकिस्तानला त्याचा आनंद घेऊदे, असे देखील पेटल गहलोत यांनी म्हटले.
गहलोत यांनी पाकिस्तानच्या दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या धोरणावरही करारी टीका केली. ” एक चित्र हजार शेकडो शब्द बोलते. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैन्याने दहशतवादी संकुलांमध्ये मारलेल्या अनेक दहशतवाद्यांचे फोटो आमच्याकडे आहेत. जेव्हा पाकिस्तानी लष्करी आणि नागरी अधिकारी या कुख्यात दहशतवाद्यांचा गौरव करतात आणि त्यांना श्रद्धांजली वाहतात, तेव्हा त्यांच्या राजवटीच्या खऱ्या स्वरूपाबद्दल काही शंका राहू शकते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
शरिफ यांच्या वक्तव्याला “हास्यास्पद नाटक” असे संबोधत गहलोत यांनी ‘कितीही खोटं बोललं तरी सत्य लपत नाही. पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या परराष्ट्र धोरणाचं समर्थन करण्याचा प्रयत्न करत आहे, पण जगाला खरी परिस्थिती माहिती आहे.
