मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. 11 जुलै 2006 रोजी मुंबईच्या पश्चिम उपनगरात एका पाठोपाठ एक असे 7 स्फोट घडवण्यात आले होते. या भयानक स्फोटात 209 हून अधिक सर्वसामान्यांना आपला जीव गमवावा लागला, तर 700 पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आरोपींना निर्दोष ठरवत त्यांची मुक्तता केली आहे.
न्यायमूर्ती अनिल किलोर आणि श्याम चंदक यांच्या विशेष खंडपीठाने सोमवारी याबाबत निकाल दिला. खंडपीठाने नमूद केले की, गुन्हे अन्वेषण यंत्रणाने या प्रकरणात कोणतेही ठोस पुरावे न्यायालयासमोर मांडले नाहित जे पुरावे सादर केले ते गुन्हा सिद्ध होण्यास सबळ नसल्याचे खंडपीठाने म्हटले. न्यायालयाने अनेक साक्षीदारांच्या जबाबांवर विश्वास ठेवण्यास नकार दिला. न्यायालयाच्या म्हणण्यानुसार स्फोटानंतर जवळपास 100 दिवसांनंतर आरोपींची ओळख पटणं शक्य नव्हे. गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेऊन तपास करण्याची गरज होती मात्र तसे झालेले दिसत नसल्याचे म्हटले.
या स्फोटानंतर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत विशेष न्यायालयात अनेक वर्षे खटला चालला. सप्टेंबर 2015 मध्ये मकोका अंतर्गत न्यायालयाने या सर्व 12 आरोपींना दोषी ठरवले होते. यातील पाच आरोपींना मृत्यूदंड आणि सात आरोपींना जन्मठेप सुनावण्यात आली होती. मात्र यातील एक आरोपी कमाल अन्सारी याचा 2021 मध्ये कोविड-19 मुळे तुरूंगातच मृत्यू झाला.
11 जुलै 2006 रोजी मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील सात लोकल ट्रेनमध्ये सलग 7 स्फोट घडवण्यात आले होते. हे सात स्फोट माटुंगा रोड, माहिम, वांद्रे, खार रोड, जोगेश्वरी, बोरीवली, आणि मीरा रोड या स्थानकांवर करण्यात आले होते. तपासात असे निष्पन्न झाले होते की या हल्ल्यामागे दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा सहभाग होता. आझम चीमा या हल्ल्याचा मुख्य सुत्रधार होता. दहशतवाद्यांनी या हल्ल्याकरीता प्रेशर कुकर बॉम्बचा वापर केला होता. आरडीएक्स(RDX), अमोनियम नायट्रेट, इंधन आणि खिळे वापरून हे बॉम्ब बनवण्यात आले होते. स्फोटानंतर घटनास्थळी सापडलेल्या प्रेशर कुकरच्या हॅंडलमुळे महत्वाची माहिती मिळाली होती.